भाजपा मंत्र्यांपाठोपाठ आता शिवसेना मंत्र्यांचेही घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. मागच्याच आठवडय़ात शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा आरे परिसरातील व्यायामशाळेतील अनधिकृत बांधकाम घोटाळा बाहेर आला होता आणि आता रवींद्र वायकर यांचा नवीन घोटाळा बाहेर आला आहे. अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला रवींद्र वायकर यांच्या भागीदारीत अनधिकृत ६ एसआरए प्रकल्प सुरू आहेत. त्याची किंमत सुमारे १००० कोटी एवढी आहे. ऐश्वर्या लाईट्स आणि ऐश्वर्या अवंत या वायकर यांच्या कंपन्या आहेत. इन्कलाब नगर, राजेश्री निवास अंधेरी पूर्व, शामनगर, महाकाली गुंफेजवळ, अंधेरी रामबागमध्ये २ प्रकल्प असे सहा अनधिकृत प्रकल्प वायकर यांच्या भागीदारीत सुरू असून यांची बाजारभाव किंमत सुमारे रुपये १००० कोटी एवढी आहे आणि सुमारे साडेतीन लाख एवढे अनधिकृत बांधकाम झालेले आहे. हरमीत सिंग गुप्ता हा या कंपन्यांचा मूळ मालक असून वायकर भागीदार आहेत. हरमीत सिंग गुप्ताला पुढे करून वायकर सगळे प्रकल्प राबवित आहेत. हे सर्व प्रकल्प राबवण्यासाठी रवींद्र वायकर यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून जलदगतीने मंजुरी मिळवली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जोगेश्वरी गुंफा संरक्षित असून त्याच्या १०० मीटर परिसरात बांधकाम करू नये असा पुरातत्त्व विभागाचा नियम आहे. तसेच हायकोर्टाचे आदेशही आहेत. तरीही सगळे नियम धाब्यावर बसवून रवींद्र वायकर यांच्या भागीदारीतील एसआरए प्रकल्प तिथे सुरूच आहे. वायकर यांच्या प्रकल्पाला १०० मीटरच्या आत परवानगी दिली.
वायकर यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून या परवानग्या मिळविल्या आहेत. आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की, रवींद्र वायकर यांना ताबडतोब मंत्रीपदावरून दूर करावे व सर्व एसआरए प्रकल्पांना स्थगिती द्यावी आणि या सर्व प्रकल्पांची सखोल चौकशी करावी. आमची दुसरी मागणी आहे की एसआरए, म्हाडा व मंत्रालयातील सर्व अधिका-यांवरही कारवाई झाली पाहिजे ज्यांनी रवींद्र वायकर यांच्या सांगण्यानुसार अनधिकृत कामे केलेली आहेत, त्यांना मदत केली ते अधिकारीही दोषी आहेत, असेही निरुपम म्हणाले.
