सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’… अनोखं निसर्गसौंदर्य, काजवा महोत्सव आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेले हे शहर म्हणजे सर्व ऋतुंमध्ये पिकनिकसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे…
हिरव्यागार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरुन फेसाळत वाहणा-या पांढ-याशुभ्र धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि लगेचच शुभ्र धुक्यांनी लपेटून घेतलेले रस्ते, या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली अवतरतात हिरवेगार गालिचे. हे निसर्गसौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग ही पवर्तराजी आपल्यातील साहसाला आव्हान देतच आपल्या पुढय़ात उभी ठाकत़ अशा या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल आणि काजवा महोत्सव पहायचा असेल तर अकोलेला जायलाच हवे.
सर्वात उंच म्हणजे 1646 मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण रतनवाडी-घाटघरही अकोले तालुक्यातच. येथील निसर्गसौंदर्य बहरते ते पावसाळ्यात, तेव्हाचा जलोत्सव आणि ऑक्टोबरनंतरचा फुलोत्सव तर जूनमधील काजवा महोत्सव पाहण्यासाठी निसर्गपर्यटकांची पावले अकोलेची वाट धरतात.
अनेकजण फक्त भंडारदरा, रंधा धबधबा, कळसुबाई, रतनगड-घाटघर हे स्पॉट पाहून माघारी फिरतात. भैरवगड, बाबरगड, पट्टा किल्ला, बितनगड अशी ठिकाणेही आपल्यातील साहसाला आव्हान देत उभी ठाकलेली आहेत.