पावसाचे आगमन.. पण महागाई कायम!

पावसाचे आगमन.. पण महागाई कायम!

भाज्यांची आवक रोडावलेलीच, टोमॅटोचे दर शंभरीपार राज्यातील विविध भागांमध्ये मोसमी पावसाच्या सरी बरसू लागल्या असल्या तरी कृषीमालाच्या उत्पन्नात अद्याप फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या सोबतीने महागाईच्या झळा कमी होतील या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई, ठाणेकरांना यासाठी आणखी काही दिवस तरी वाट पाहावी लागेल, असे चित्र आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी आणि कल्याण येथील घाऊक बाजारांमध्ये भाज्यांची आवक समाधानकारक झाली असली तरी टोमॅटो, ढोबळी आणि हिरव्या मिरचीचे दर अजूनही चढेच आहे. याशिवाय इतर प्रमुख भाज्यांचे दरही ३०, ४० रुपयांच्या आसपासच आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यावर आवक कमी होत असली तरी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत भरपूर भाजीपाला मुंबईत येत असतो. यंदा मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ातून मुंबईत येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घटले आहे. त्याचा फटका मुंबई, ठाणेकरांना बसू लागला असून जवळपास सर्वच भाज्यांचे किरकोळ दर ६० रुपयांच्या पलीकडे पोहोचल्याने महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी अजूनही आवक वाढलेली नाही, अशी माहिती मॅफको बाजारातील व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी लोकसत्ता ठाणेला दिली. पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ात अजूनही पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे मुंबईस होणारी भाज्यांची आवक जैसे थे आहे. पाऊस वाढताच पुढील दोन आठवडय़ांत हे चित्र बदललेले आणि भाज्यांची महागाई काही प्रमाणात आटोक्यात येईल, असा दावा मालुसरे यांनी केला. मुंबई बाजारात दररोज सरासरी ६० ते ७० गाडी टोमॅटोची आवक होत असते. मात्र, नारायणगाव, जुन्नर यांसारख्या भागात होणारे टोमॅटोचे उत्पादन ७० टक्क्यांनी कमी झाल्याने वाशी बाजारात जेमतेम २५ गाडय़ा येत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या टोमॅटोचे दर शनिवारी किलोमागे ६५ रुपयांपर्यत पोहोचले होते. रविवारच्या सुट्टीमुळे सोमवारी आवक काही प्रमाणात वाढल्याने हे दर ६० रुपयांपर्यत स्थिरावले असले तरी वाशी, ठाण्याच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीच्या टोमॅटोच्या दरांनी शंभरी ओलांडल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. याशिवाय घाऊक बाजारात भेंडी (४०), फरसबी (६५), फ्लॉवर (२४), घेवडा (४०), कारली (३६), शिमला मिरची (६०), शेवग्याची शेंग (३४), हिरवी मिरची (६५), तोंडली (४०), वाटाणा (७०) अशा सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. फ्लॉवर, भेंडी, घेवडा यासारख्या भाज्यांचे दर गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत काही प्रमाणात खाली उतरले असले तरी किरकोळीत मात्र महागाईच्या झळा कायम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *