अणू पुरवठादार गटात स्थान मिळवण्यासाठी भारताच्या धडपडीमध्ये चीन अडथळे आणत आहे तर दुसरीकडे भारतात घुसखोरीचे प्रयत्न सुरूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे २५० सैनिक घुसले होते, अशी माहिती संरक्षण खात्याच्या व गुप्तचर यंत्रणांनी दिली. विशेष म्हणजे हे सैनिक एकत्रित घुसण्याऐवजी चार गटांमध्ये घुसले होते. ही घटना ९ जून रोजी घडली.
भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर अणू पुरवठादार गटात (एनएसजी) स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. मात्र चीनने त्याला विरोध केला आहे. चीनने भारतात घुसखोरीची परंपरा सुरूच ठेवली आहे. गेली दोन वर्षे चीन भारताच्या लडाख भागात घुसखोरी करत आहे. त्याला भारतीय लष्कराने जोरदार विरोध केला. त्यानंतर ते चिनी सैन्य पुन्हा त्यांच्या सीमेत परतले.
अरुणाचल प्रदेश हा आमचाच भाग असल्याचा दावा चीन करत आहे. यंदा पहिल्यांदाच चिनी सैन्य भारताच्या हद्दीत आले. जवळपास तीन तास ते भारताच्या हद्दीत होते. काही वेळेनंतर ते आपल्या भूभागात परतले. या घुसखोरीची गंभीर दखल भारतीय लष्कराने घेतली असून चीन सरकारकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.