अणुपुरवठादार गटात भारताला सामील करण्यासाठी अमेरिकेने भक्कम पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसाठी पाकिस्तान हा केवळ गरजेपुरता असल्याची टीका पाकिस्तानचे परराष्ट्र विभागाचे सल्लागार सरताज अझीझ यांनी केली आहे.
अमेरिकेने अणुपुरवठादार गटात सामील करण्यासाठी भारताला पाठिंबा दिल्यानंतर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकमधील विविध माध्यमांनीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र नीतीचे कौतुक करण्यात येत असून ‘अशा प्रकारची नीती पाकिस्तान का वापरत नाही?‘ असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अणुपुरवठा गटात भारताचा समावेश केल्यास पाकिस्तान आपली चिंता अमेरिकेला कळवेल, तसेच यासंदर्भात येत्या 10 जून रोजी पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान एक उच्चस्तरीय बैठक असल्याचे अझीझ यांनी सांगितले.
मंगळवारी अमिरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीदरम्यान अमेरिकेने अणुपुरवठादार गटात सामील होण्यासाठी भारताला पाठींबा दर्शविला आहे. दोन्ही देशांनी या भेटीत सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याबाबत करारही केला आहे. दरम्यान अणुपुरवठादार गटात भारताचा समावेश होऊ नये आणि त्या ऐवजी पाकिस्तानची तिथे वर्णी लागावी यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी आणि मुत्सद्देगिरीचे पराकोटीचे प्रयत्न सुरू केले आहेत.