लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायद ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला.
२२ मे रोजी दोघांचा विवाह झाला होता. त्यावेळी जात पंचायतीने नवरदेवाला सफेद रंगाची चादर दिली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर ती चादर परत करण्यास सांगितले होते. नवरदेवाने दुस-या दिवशी चादर जात पंचायतीमधील सदस्यांना दाखवली त्यावर रक्ताचे डाग नव्हते. त्यावरुन पंचांनी वधू कुमारीका नसल्याचा निष्कर्ष काढत विवाह मोडण्याचा आदेश दिला.
नववधू विवाहाआधी पोलिस भरतीसाठी तयारी करत होती. त्यात धावणे, लांब उडी, सायकलिंग आणि अन्य व्यायाम प्रकारांचा समावेश होता असे सामाजिक कार्यकर्ते रंजना गावंडे आणि क्रिष्णा चंदुगुडे यांनी सांगितले. यावर सर्वमान्य तोडगा निघाला नाही तर, पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.