केरळमध्ये आम्हाला पराभव मान्य करावा लागेल असे चित्र दिसत आहे. आणि पराभव झाल्यास या पराभवाची जबाबदारीही निश्चित केली जाईल, अशी कबुली काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी दिली.
मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर केवळ दोन तासांतच निकालाचा कौल स्पष्ट होऊ लागला. डावी लोकशाही आघाडी केरळमध्ये सत्तेत येणार असे चित्र दिसल्यावर चाको यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) काही मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्याची शक्यता आहे. यावरून भाजपने आपले स्थान अधिक पक्के केले आहे.
काँग्रेसचा पराभव झाल्यास त्याची जबाबदारी प्रादेशिक वा स्थानिक नेत्यांवर निश्चित केली जाते. मात्र, विजय मिळविल्यावर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना श्रेय दिले जाते असा सूर विरोधक आळवतात. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चाको यांनी सांगितले की, पराभवाची जबाबदारीही निश्चित केली जाईल.