पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी संपल्यानंतर आज (गुरुवार) सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. एक्झिट पोलच्या (मतदानोत्तर कलमापन चाचणी) अंदाजामध्ये वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आसाममध्ये भाजप आघाडी काँग्रेसला धक्का देत सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार भाजप आघाडीला 49 जागांवर यश मिळाल्याचे दिसत आहे.
आसाममध्ये मात्र सत्तधारी कॉंग्रेसला सत्ता टिकविण्याचे आव्हान होते. एकूण 126 जागांच्या विधानसभेत कॉंग्रेसचे फक्त 53 च सदस्य प्रवेश करू शकतील, असा कलचाचणीचा अंदाज आहे. भाजपने या राज्यात मात्र जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत असून, त्यांना आणि मित्र पक्षांना मिळून 55 जागा मिळू शकतील. या वेळी 12 जागा मिळण्याचा अंदाज असलेला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
