शहापूर ते मंत्रालय जलदिंडी

शहापूर तालुक्यातील पाण्याच्या दुर्भिक्ष्याविषयी मंत्रालयावर जलदिंडी घेऊन आलेल्या शहापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची आणि शहापूरवासीयांची मंगळवारी घोर निराशाच झाली.

राज्यात दुष्काळ पडला असताना मुंबईला पाणी पुरवणा-या शहापूर तालुक्यातील अनेक गावेही तहानलेली आहेत. या परिसरातील समस्या सरकारदरबारी मांडण्यासाठी भाजपाचे माजी शहापूर तालुका अध्यक्ष संतोष शिंदे आणि युवा-महिलावर्गाने मंत्रालयावर धडक मारली होती. मात्र तब्बल ७२ मैलांची पायपीट करून आलेल्या या शहापूरकरांच्या पदरी कुठल्याही ठोस आश्वासनाशिवाय फक्त निराशाच पडली.

राज्यात भाजपाचे सरकार असूनही भाजपाच्याच मंडळींना शहापूरसाठी जलदिंडी मंत्रालयावर आणावी लागली, याबद्दल शहापूरवासीय संताप व्यक्त करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहापूर तालुक्याची पाण्याची मागणी व इतर समस्यांबाबत निवेदन दिले.

या वेळी कोणतेही ठोस आश्वासन न देता फडणवीस यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली. शहापूर तालुक्याची पाण्याची मागणी नैसर्गिकरीत्या आम्ही पूर्ण करू, असे अजब विधान या वेळी मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच, मुंबई महापालिकेशी संबंधित प्रश्नांसंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधींसह तातडीची बैठक बोलावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शहापूर तालुका दत्तक घ्यावा, आरोग्य सुविधा पुरवाव्यात या मागण्यांची यामुळे ठोस तड लागू शकली नाही. मंत्रालयावर आलेल्या सुमारे अडीचशे जणांच्या जलदिंडीत युवा-महिलावर्गासह शहापूरच्या नगराध्यक्षा योगिता धानके याही सहभागी झाल्या होत्या.

शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, माजी आमदार दौलत दरोडा यांचाही समावेश होता. शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणांतून मुंबईसह ठाणे, कल्याण व उपनगरांना सुमारे २८०० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवले जाते. या एका दिवसाच्या पाण्यातून शहापुरातील ४ लाख नागरिकांची वर्षभराची गरज भागू शकते.

मात्र तरीही फडणवीस सरकार याकडे दुर्लक्ष करुन येथील ग्रामीण भागातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथे १३१ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून केवळ ४७ योजना कागदोत्री तयार आहेत. उर्वरित ८४ योजना अधिकारी, ठेकेदार व तांत्रिक मुल्यांकन यांच्या दलदलीत फसल्या आहेत. त्याबाबतही प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने शहापूरवासियांमध्ये फडणवीस सरकारविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

शहापूर तालुका मुंबई महानगर पालिकेने दत्तक घ्यावा, येथील रस्ते तसेच वैद्यकीय सेवेसाठी निधी उपलब्ध करुन घ्यावे, सन २०१४ ते २०१६ या काळात मंजूर झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची चौकशी करुन भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई करावी, खर्डी व साकडबाब पठारावर उपसा जलसिंचन प्रकल्प राबवावा अशा १० मागण्या घेऊन ही जलिदडी शनिवारी शहापूरमधून निघाली होती. मंगळवारी शहापूर बंद ठेवून येथील लोकांनी जलंदिडीला जाहीर पाठिंबा दर्शवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *