रेल्वे प्रवाशांना वेगवान इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा, काचीगुडा आणि छत्तीसगढमधील रायपूर स्थनकांवर गुगलच्या मदतीने येत्या गुरुवारी विनामूल्य वाय-फाय सेवा सुरु करण्यात येणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दिल्लीतील रेल्वे भवनातून या सेवेचे उद्घाटन करणार आहेत. एप्रिलमध्ये भुवनेश्वर येथील रेल्वे स्थानकावर अशी सेवा सुरु करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना वेगवान इंटरनेट सेवा पुरविणे हा या मागील उद्देश असून ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे अशा प्रत्येकाला ही सेवा वापरता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने चांगली इंटरनेट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने या वर्षअखेर देशभरातील 100 सर्वांत गर्दीच्या स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.