बाजारात तूरडाळ, उडीद डाळीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ हद्दपार होऊ लागली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने १२० रुपये किलोने विकण्यासाठी चार राज्यांना १०,४०० किलो डाळ आपल्या कोटय़ातून दिली आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने राज्यातील फडणवीस सरकारला डाळ वाटपात ठेंगा दाखवला आहे.
बाजारात तूरडाळ, मसूरडाळ, मूगडाळींचे भाव १५० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वैतागले आहेत. सध्या तामिळनाडू, प. बंगाल, केरळ, आसाम या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुका सुरू आहेत. यावेळी जनमत आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून केंद्र सरकारने तातडीने चार राज्यांना आपल्या कोटय़ातील डाळ देऊ केली आहे. दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडूला १०,४०० किलो डाळ दिली.
ही डाळ १२० रुपये किलोने विकायची आहे. विशेष म्हणजे या सर्व राज्यांत विरोधी पक्षाचे सरकार असतानाही मोदी सरकार त्यांच्यावर मेहरबान झाले. मात्र, भाजपाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या तोंडाला नेहमीप्रमाणे पाने पुसण्याचे काम मोदी सरकारने केले.केंद्राकडे डाळींचा ५० हजार टनांचा साठा आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय भांडार व ‘सफल’मधून तूर व उडीदडाळीचा ४०० टन साठा दिल्लीला दिला. आंध्र प्रदेशने ८ हजार टन तूरडाळ मागितली, त्यांना दोन हजार टन डाळ दिली. तेलंगणने १५ हजार टन डाळ मागितली त्यांना दोन हजार डाळ दिली. विशेष म्हणजे तामिळनाडुने १० हजार टन मागताच त्यांना लगेच पाच हजार टन डाळ देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने ३० हजार टन तूर व उदिड डाळीची मागणी केली. मात्र त्यावर विचार सुरू असल्याचे उत्तर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिले.