केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणातील असताना कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाडय़ांच्या प्रतीक्षायादीने कोकणावासीयांना अक्षरक्ष: घाम फुटत आहे. यापूर्वी गणेशोत्सवात डेमू ट्रेन पुन्हा धावेल, अशी अपेक्षा असताना मध्य रेल्वेने कोकणवासीयांचा मोठा अपेक्षाभंग केला आहे. ऐकीकडे उत्तर भारत आणि देशभरात विशेष गाडय़ांचा सपाटा लावला जात असताना गणेशोत्सवात प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली डेमू कोकणात न चालवण्याचा निर्णय घेतल्याने मध्य रेल्वेकडून कोकणातील प्रवाशांची उपेक्षा सुरू असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
उन्हाळय़ात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या लक्षात घेऊन विशेष ट्रेन चालवण्यात आल्याने डेमू ट्रेन चालवण्याची आवश्यकता नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र चालवण्यात आलेल्या सर्व गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात प्रतीक्षायादी आहे. शिवाय काही प्रमाणात आसने उपलब्ध असलेली डबल डेकर खिशाला गरम पडत असल्याने या गाडीचा प्रवासही परवडत नाही. त्यातुलनेत यापूर्वी पनेवल ते चिपळूण धावलेल्या ‘डेमू’ला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पुन्हा ही गाडी कोकणात चालवावी, अशी मागणी होत आहे.
मात्र, देखभाल प्रवासी संख्या अशी नाना कारणे पुढे करून मध्य रेल्वे यातून काढता पाय घेत आहे. कोकणात जाणा-या अनेक पॅसेंजर गाडय़ा फुल्ल जात असल्याने या काळात डेमू ट्रेन अधिक फायदेशीर ठरली असती. मात्र प्रवाशांच्या गैरसोयीचा साधा विचारही न करता ही गाडी मिरजला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कायमच कोकणावर वक्रदृष्टी धरणारे मध्य रेल्वे प्रशासन खुद्द रेल्वेमंत्री कोकणातील असतानाही प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी प्रवाशांतून उमटत आहे.