मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौरे करून सरकारला उपाय सुचवले होते. त्यानंतर मंत्र्यांचे दुष्काळी दौरे झाले, पण दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात त्यांना यश आलेले नाही. सरकारला दुष्काळावरील उपाययोजनांबाबत गांभीर्य नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सुळे यांनी आज गेवराई तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून पक्षातर्फे सुरू असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकरी, महिला, विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित आदी उपस्थित होते.
सुळे यांनी धोंडराई (ता. गेवराई) येथील अमृता नदीवर जलशारदा प्रतिष्ठानतर्फे बांधण्यात येणारा बंधारा, नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी केली. या वेळी त्या म्हणाल्या की, मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पाच वेळा सरकारकडे जाऊन उपाययोजना करण्याबाबत विनंती केली. मात्र, सरकारने लक्ष दिले नाही.