त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणा-या स्वराज्य संस्थेच्या महिलांना बुधवारी सकाळी अमानुष मारहाण करण्यात आली.
पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मंदिरात प्रवेशाचा अधिकार मिळायला हवा. कोणताही कायदा महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्च रोजी दिले आहेत. कायद्याने सगळ्यांना गर्भगृहात प्रवेश देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर स्वराज्य संस्थेच्या महिलांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभा-यात जाऊन दर्शनाची इच्छा व्यक्त केली.
मात्र मंदिर पुजारी, विश्वस्त आणि स्थानिक गावक-यांनी त्यांना विरोध करत महिलांसाठी सकाळी ६ ते ७ ही दर्शनासाठीची वेळ निश्चित करण्यात आली.
त्यानुसार या महिला आज सकाळी गर्भगृहासमोर दर्शनासाठी आल्या असता वेळ संपल्याचे कारण सांगत त्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर संतप्त महिलांनी विरोधकांशी झटापट केली. यावेळी महिलांना धक्काबुक्की करत अमानुष मारहाण केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी काही गावक-यांवर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, घडल्या प्रकारामुळे मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.