दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलमधील महाराष्ट्रातील सामने इतरत्र हलविण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बीसीसीआयला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. १ मे रोजी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे या सामन्याला न्यायालयाने मान्यता दिली.
महाराष्ट्रातील मोठा दुष्काळ पाहता ३० एप्रिलनंतर राज्यात आयपीएलचे सामने खेळवू नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले होते.
आयपीएल सामने नाकारलेत, तर महाराष्ट्राचे १०० कोटींचे नुकसान
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये होणा-या २० सामन्यांपैकी १३ सामने अन्यत्र खेळवावे लागणार आहेत. येत्या २९ एप्रिल रोजी पुणे संघाचा गुजरातविरुद्ध सामना पुण्यात होणार आहे. त्यानंतर लगेच एक मे रोजी पुण्यामध्येच पुणे संघाचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. दोन दिवसांत सामना इतरत्र हलविण्यासाठीची व्यवस्था करणे अशक्य असल्याचे सांगत हा सामना पुण्यातच खेळू द्यावा, अशी विनंती बीसीसीआयने न्यायालयाकडे केली होती.
‘आयपीएल सामन्यांसाठी सांडपाणी वापरणार’
न्यायालयाने बीसीसीआयची ही विनंती मान्य केली असून एक मे रोजी होणारा सामना पुण्यातच खेळण्यासाठी मान्यता दिली. अपवाद म्हणून १ मे रोजी होणारा सामना पुण्यात खेळण्यास परवानगी देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.