राज्यातील शासकीय रुग्णालयांसह जिल्हा, तालुका रुग्णालये; तसेच महापालिकांच्या रुग्णालयांत डेंगी, चिकुनगुनिया आणि मलेरिया अशा तापाच्या आजारांवर शासकीय-निमशासकीय यंत्रणा सक्षमपणे काम करत असली, तरी 2014 व 15 या वर्षांत डेंगीमुळे 177 रुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
डासामुळे पसरणाऱ्या या विषाणूजन्य आजाराचे वेळेत निदान होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालये अद्ययावत यंत्रणेने सक्षम करण्यात आली आहेत. यासाठी क्षेत्रीय पातळीवर आरोग्य कर्मचारी वेळोवेळी नागरिकांच्या घरी भेट देऊन रुग्णांची माहिती गोळा करत असतात. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता यंदाच्या वर्षी राज्यभरात 21 ते 27 मार्चदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. त्यात डेंगीचे 907 संशयित रुग्ण आढळून आले. यात 377 रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 31 रुग्णांना डेंगी झाल्याचे दिसून आले. मात्र, या सर्वांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंगीबाबत पूर्वानुभव वाईट असल्याने प्रत्येक महिन्याला राज्यभरात सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यात 2014 मध्ये डेंगीचे 8 हजार 573 रुग्ण आढळून आल्यानंतर 144 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये आढळून आलेल्या 5 हजार 119 पैकी 33 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक महिन्याला रुग्णांचे सर्वेक्षण करून तातडीने उपचार करण्यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून आली.
जनजागृतीसाठी उपाययोजना
– राज्यात 34 केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत
– पुण्यात 2 हजार 648 डॉक्टरांना प्रशिक्षण
– आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी उपाययोजना

