भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याच्यावेळी भारताचा पराभव झाल्यानंतर झालेल्या वादातून येथील एका खासगी विद्यापीठात हाणामारी झाली होती. त्या कारणावरून तेथील जम्मू काश्मीरच्या नऊ विद्यार्थ्यांना आणि त्याच राज्याचा नागरिक असलेल्या हॉस्टेल वॉर्डनला पोलिसांनी अटक केली आहे. मेवाड विद्यापीठात हा प्रकार घडला. विद्यापीठाने या नऊही विद्यार्थ्यंना आपल्या कॉलेजातून निलंबीत केले आहे.
मेवाड विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी हरिष गुरनाणी यांनी सांगितले, की या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केलेल्या गुंडागर्दीमुळे एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने एकूण 16 विद्यार्थ्यांना 25 एप्रिल पर्यंत निलंबीत केले असून त्यातील नऊ जणांना पोलिसानी अटक केली होती. सोमवारी त्यांना सोडून देण्यात आले आहे. क्रिकेट सामन्यातून झालेली वादावादी आणि विद्यार्थ्यंनी गोमांस शिजवल्याची अफवा यातून हा प्रकार घडला. विद्यापीठाच्या हॉस्टेलचा वॉर्डन नज्बुल्ला शहम यालाही अटक करण्यात आली होती. विद्यापीठाने त्यालाही निलंबित केले आहे.