सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंदाजपत्रकीय मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या खात्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णींवर आरोप केले. तसेच त्यांनी आणलेल्या बेकायदा फायलींवर तुम्ही डोळे झाकून सह्या करत होतात असा ठपकाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधाकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ठेवला. या खात्यात बदल्या, बढत्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा तपशील माझ्याकडे आहे. पण मी तो आत्ता उघड करत नाही असा गर्भित इशाराही पाटील यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अतिरिक्त मुख्य सचीव आनंद कुलकर्णी यांनी आणलेल्या फायलींवर सार्वजनिक बंधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या प्रेरणेने सह्या करती होते असे विचारून पाटील म्हणाले की, कुलकर्णींनी या खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर वरवंटा फिरवला, मनमानी पद्धतीने बदल्या केल्या, हव्या तशा चौकशा लावल्या, निलंबित केले आणि पुन्हा तातडीने कामावरही घतले हे सारे होताना मोठा आर्थिक व्यवहारही झाल्याचा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला.
आनंद कुलकर्णी कुणाच्या पैशाने नागपुरात पंचतारांकित हॉटेलात थांबले होते, ते नाईट ड्रेसवर मुख्यमंत्र्यांना भेटायला कसे जाऊ शकतात. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या फाईली सामान्य प्रशासन खात्याकडे पाठवल्यानंतर लगेचच त्या विभागाकडे माहितीच्या अधिकारात स्वतःच त्याच फायलींविषयी कसे काय प्रश्न केले, हे एका सचिवाने दुसऱ्या सचिवांना केलेले ब्लॅकमेलिंगच नाही का? असे अनेक सवाल करीत कुलकर्णींच्या कारभाराची पूर्ण चौकशी करा अशीही मागणी जयंत पाटील यंनी केली. टोल संस्कृती मीच आणली आणि मीच ते बंद करू शकतो असे नितीन गडकरींनी म्हटल्याची आठवण देऊन पाटील म्हणाले की, तुम्ही काही टोल बंद केलेत, पण त्यापेक्षा अधिक संख्यने टोल सुरुच आहेत. मुंबईचा टोल तुम्ही कधी बंद करणार असा सवाल करून पाटील म्हणाले की, त्यासाठी तुम्ही कुलकर्णींची समिती नेमलीत, पण त्यांनी दोनच बैठका घेतल्या. कोल्हापूरचा टोल बंद करण्याचा निर्णय तुम्ही केलात, पण मग बारामती व अमरावती इथेही तसेच शहरांतर्गत टोल आहेत ते का बंद करत नाही असाही सवाल पाटील यांनी केला.