गीरमध्ये घुसमटला वनराजाचा श्वास

आशियाई सिंहांचे हक्काचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीर अभयारण्यामध्येही वनराजाचा श्‍वास घुसमटत असून, येथील सिंह अकाली मरण पावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांमध्ये तीन सिंह मरण पावले असून, पाच वर्षांचा विचार केला असता अकाली मृत्यूची ही संख्या 25 च्या घरामध्ये पोचत असल्याचे दिसून येते. मध्यंतरी अमरेली जिल्ह्यामध्ये सिंहांचे तीन मृतदेह आढळून आले होते. मृतांमध्ये एक सिंहीण आणि तिच्या दोन छाव्यांचा समावेश आहे.
सौराष्ट्रामध्ये सिंहांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून, नेमके याच ठिकाणी त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. मध्यंतरी अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका छाव्याचा मृत्यू झाला होता. मागील पाच वर्षांमध्ये गीरमधील 310 सिंह मरण पावले असून, त्यातील 25 जणांचे मृत्यू हे अकाली आहेत. सिंहाच्या एका छाव्याचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने यामागे घातपाताचा संशय व्यक्त होतो आहे. सिंहांच्या या अकाली मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालांचा अभ्यास करून ही समिती एक सविस्तर अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सिंहांच्या मृत्यूची नेमकी कारणे समजू शकतील, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *