विवाह सोहळेही आता विकतच्या पाण्यावर!

साक्री तालुक्‍यात पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. आजमितीस किमान नव्वद टक्के गावांत हा प्रश्‍न गंभीर आहे. घरगुती वापर किंवा पिण्याच्या पाण्यासाठी लढाई आहे, तिथे लग्न समारंभांचे काय ? असे म्हणत जवळपास प्रत्येक लग्नात विकतचे पाणी आणावे लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून लग्न तुमच्याकडे ठेवा, अशी विनवणी केली जात आहे. एकूणच दुष्काळ आणि पाणीटंचाईने समाजजीवनावर असे वेगवेगळे परिणाम होऊ लागले आहेत.
साक्री तालुक्‍यात यंदा जानेवारीपासून पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. शेती व्यवसायासह अन्न व्यवसायात मंदीचे सावट आहे. त्यामुळे विवाह जमल्यावर पहिली चिंता भेडसावते ती पाण्याची. दुसरीकडे लग्न म्हणजे वर- वधू पित्याची धावपळ सुरू होते. सर्व बाबींची जुळवाजुळव करावी लागते. वाजंत्री, मंडप, घोडा याच्या तारखा दिल्या जातात. तशी आता पाण्याचीही ऑर्डर दिली जाते.
लग्न म्हणजे यमजानाला तीन दिवस आधीपासून पाण्याची तरतूद करावी लागते. बेहेड, विराई, निळगव्हाण आदी गावात पावसाळ्यात देखील पाणी समस्या असते. या गावात लग्न किंवा अन्य कार्यक्रमांसाठी टॅंकर मधून पाणी आणल्याशिवाय पर्याय नसतो. बहुतेक ठिकाणी थंड पाण्याचे जार आणावे लागतात. तालुक्‍यात अपवादात्मक गावे सोडली तर अन्य गावांमध्ये पाणी समस्या आहेच. त्यामुळे लग्नविधीसारखे कार्यक्रम कसे पार पाडावेत असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडत आहे. या समस्येने बहुतांश पालकांनी धसका घेतला आहे.
पाणीप्रश्‍नी आता वरपित्यांना देखील तडजोड करावी लागत आहे. मुलाचे लग्न व्हावे म्हणून वरपिता देखील घरी लग्न ठेवू लागले आहेत. काहींनी पाण्याच्या समस्येमुळे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुलामुलींचे साखरपुडा, जागरण गोंधळ, लग्न समारंभही उरकून घेतले आहेत. ज्यांची व्हायची आहेत अशांना पाणी समस्येची काळजी वाटत आहे.
दुष्काळाचे सावट गडद
साक्री तालुक्‍यात काही वर्षापासून दुष्काळ पाणीटंचाईची स्थिती नित्याची झाली आहे. बेभरवशाचे शेती उत्पादन, रोजगाराच्या अभावामुळे समस्या वाढल्या आहेत. पाण्यासाठी तालुक्‍यात सर्वाधिक आंदोलने उपोषण झालीत. लोकप्रतिनिधी केवळ आश्‍वासने देतात. जलस्तर प्रचंड खाली गेल्याने पाणी समस्या न मिटणारी आहे. लग्न सोहळ्यांनाही आता त्याचा थेट फटका बसू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *