स्नेहाची बोलू बोली.. सण हा येता होळी!

स्नेहाची बोलू बोली.. सण हा येता होळी!

एखादा दिवस असा असतो की, नुसती त्या दिवसाची चाहूल जरी लागली तर मन आनंदाने कावरेबावरे होते. मग ‘गणेशोत्सव’ असो किंवा ‘दहीहंडी.’ काही क्षणातच त्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वत:ला झोकून देतो. असा सण म्हणजे होळी आणि त्यापाठोपाठ दुस-या दिवशी येणारी रंगपंचमी. दृष्ट प्रवृत्तीला प्रतीकात्मकरीत्या अग्नीच्या स्वाधीन केल्यावर दुसरा दिवस एका अनोख्या आनंदाची पर्वणी असते.

मनुष्याच्या मनातील वाईट विचार ‘होळी’च्या त्या पवित्र आगीत जाळून राख करणे, हाच मुळात होळीचा उद्देश आहे. निसर्गात दाखल झालेल्या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी केलेली रंगांची उधळण म्हणजे ‘रंगपंचमी’. यादिवशी लोक आपापसातील मतभेद विसरून, भांडण, गरीब-श्रीमंत भेद विसरून एकत्र येतात. यामागील प्रथा फार मजेशीर आहे. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण सखी राधाच्या सुंदरतेला पाहून यशोदेला म्हणाले, निसर्गाने माझ्याशी दुजाभाव केला आहे.

राधेला गोरा तर मला सावळा रंग दिला आहे. तेव्हा त्याची समजूत काढण्यासाठी यशोदेने त्याला सांगितले की, राधेला तुला आवडेल त्या रंगाने रंगव. त्यानुसार आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे खटय़ाळ बाळकृष्णाने राधेला रंगात रंगवले. त्या दिवसांपासून रंगपंचमीचा खेळ, प्रथा एक उत्सव म्हणून गोकुळात साजरी व्हायली लागली. कालांतराने संपूर्ण देशभरात हा रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा केला जातो. रंगाची उधळण करून आनंद व्यक्त केला जातो. इतकेच नाही तर फाल्गुनी पौर्णिमेला घरगुती साजरी करण्यात येणारी होळी आता सामुदायिक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे.

‘‘रंग बरसे भिगे चुनरियॉं.. रंग बरसे’’ असे म्हणत धम्माल, मस्तीत हा सण साजरा केला जातो. जगात कुठेही नसेल अशी ही अद्भुत परंपरा भारतवर्षाचे एक वैशिष्टय़े आहे. मुलांपासून ते थेट वयोवृद्धही तितक्याच तन्मयतेने यात सहभागी होतात. परंतु, काळाच्या या बदलत्या ओघात होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत कुठे तरी बदलत चाललेली आहे. हल्ली रंगपंचमी ही क्लब, रेस्टॉरन्टमध्ये मोठय़ा वाद्याच्या संगीतमय वातावरणात, मद्यप्राशन करून साजरी केली जाते. अशाप्रकारे काही अंशी ही रंगपंचमी सिने कलाकार, उच्चवर्गीय लोक यांच्याकडेच साजरी होते. या सर्व प्रकारांमुळे नव्या पिढींच्या मनावर चुकीचे संस्कार रूढ होत आहेत.

आता हे बघ ना.. लहान मुले ज्या पिचका-यांनी रंग उधळतात, त्या पिचका-यांचे आकार अक्षरश: बघण्यासारखे असतात. काही पिचका-यांचे आकार हे बंदुकीचे, तलवारीचे असतात. यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर नकळत वाईट परिणाम होऊ शकतात. त्याची पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. आता रंगपंचमी हा सण नैसर्गिक रंगाचा राहिला नसून रासायनिक रंग आणि मद्यप्राशन करणा-या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची जागा घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *