दहा अतिरेकी घुसले; देशभरात हाय अ‍ॅलर्ट!

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे १० अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच गुजरातमध्ये राज्यव्यापी अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कच्छ आणि अन्य ठिकाणी छापे घालण्यात आले असून, महत्त्वाच्या संस्था आणि संवेदनशील भागांत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. एनएसजीच्या चार चमूही तयार ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिल्लीसह महाराष्ट्रातही हाय अ‍ॅलर्ट जारी करतानाच सर्व महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(एनएसए) नासीर खान जनुजा यांनी भारताचे एनएसए अजित डोवाल यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गुजरातमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीच्या पर्वावर राज्य सरकारने सर्व मुख्य मंदिरांभोवती सुरक्षा वाढविली आहे. दक्षिण कच्छमध्ये वरिष्ठ पोलीस अधीक्षक मार्कंड चौहान यांच्या नेतृत्वात भुज तालुक्यातील वारनोरा या गावी छापे मारून शोधमोहीम पार पाडण्यात

आली. पोलिसांनी भुजमधील नूरानी महाल हॉटेल आणि मुस्लीम जमात खानामध्येही छापा मारला. अतिरेक्यांनी गुजरातमध्ये प्रवेश केल्याची गोपनीय माहिती राज्य सरकारला केंद्र सरकारकडून शनिवारी मिळाली होती. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सर्व उपाययोजनांवर विचार केला जात असल्याचे गुजरातचे गृहराज्यमंत्री रजनी पटेल यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या संस्था आणि लष्करी प्रतिष्ठानांसह प्रमुख मॉल, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुजरातमार्गे भारतात प्रवेश केलेल्या अतिरेक्यांनी दिल्लीला लक्ष्य ठरविले असण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी नाकारलेली नाही. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि विशेष सेलने त्याबाबत चर्चा केलेली नाही. सर्व गजबजलेल्या बाजारपेठा, मेट्रो स्थानकांवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे काम करीत आहेत की नाहीत,याची पोलीस खात्री करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *