लातुर/बीड/उस्मानाबाद: मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज सकाळी लातूरमध्ये दाखल झालेल्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या गावाला भेटी द्यायला सुरुवात केली आहे. या प्रत्येक भेटीत राज्यातल्या सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय.
पंकजा मुंडेंचा शेतकऱ्यांशी संवाद
बीडच्या गेवराई गावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाणीटंचाईमुळे ज्या मुलीचा मृत्यू झाला, त्या विहीरीलाही पंकजा मुंडेनी भेट दिली. यानंतर गावातल्या महिलांशी पंकजा मुंडेशी पाणीटंचाईसंदर्भात बैठक घेतली.
विष्णु सावरांकडून पाहणी
तर दुसरीकडे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी लातूर तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी सरकारी योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहेत की नाही याचा सावरांनी आढावा घेतला.
मुनगंटीवारही दौऱ्यावर
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही बीडमधल्या दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली. यंदा मराठवाड्याला दुष्काळाचा सर्वाधीक फटका बसलाय.त्यामुळे सरकारविरोधात गावकऱ्यांमध्ये असलेला असंतोष जागोजागी दिसून येतोय.
तावडेंचा ताफा अडवला
उस्मानाबदच्या येडशीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा ताफा अडवला. ताफा अडवणाऱ्या 3 स्वाभिमानी शेतकरी संघनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्य़ात घेतलंय. आज सकाळी येडशी गावात विनोद तावडेंच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकण्याचा प्रयत्न केला.
सरकारच्या योजना ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. तर दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही काळे झेंडे दाखवत तावडेंचा निषेध केला. त्यामुळे एकंदरीत सर्वचं मंत्र्यांवर शेतकऱ्यांचा रोष आहे हे दिसून येतंय.
मुख्यमंत्री लातूरमध्ये
मुख्यमंत्र्यांसह राज्यमंत्रिमंडळातले अनेक मंत्री आज मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री लातूरला पोहोचतील. त्यानंतर लाबोटा गावाला भेट देणार आहेत.
इतर मंत्रीही आज ट्रेननं नेमून दिलेल्या तालुक्याच्या दौऱ्यावर दाखल झाले. दुपारी निलंग्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली जाणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता सर्व मंत्र्यांची लातूरला आढावा बैठक होणार आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, प्रशासनानं पोहोचवलेल्या सर्व सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतोय का? याचा आढावा मंत्री घेणार आहेत.
दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या दुष्काळ दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली. कॅबीनेटमधल्या तीन मंत्र्यांनी मराठवाड्यातील 3 दुष्काळग्रस्त तालुक्यांना भेट दिली. तर उर्वरित मंत्री काल रात्री लातूर एक्स्प्रेसनं मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.