आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तरी, अंतिम सामन्यात भारताविरुद्धच खेळण्याची पाकिस्तानी खेळाडूंची इच्छा असल्याचे, पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने म्हटले आहे.
साखळी फेरीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव केला होता. भारताने पाकिस्तानचा डाव अवघ्या 83 धावांत संपुष्टात आणला होता. या पराभवानंतर पाकिस्तानने यूएई संघाचा सात गडी राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला आहे. पाकिस्तानचा अद्याप बांगलादेश आणि श्रीलंका संघाशी सामना शिल्लक आहे. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
मलिक म्हणाला की, शेर-ए-बांगला स्टेडियममधील खेळपट्टीशी जुळवून घेण्यात आम्ही असमर्थ ठरलो होतो. त्यामुळे आम्हाला भारताविरुद्ध साखळी फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, आता संघातील प्रत्येक खेळाडू अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे. पराभवानंतर आम्ही निराश झालो होतो, पण आता प्रत्येकजण अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रय़त्नशील आहे.