भारत-पाक संग्रामाची आज पहिली लढाई

धरमशाला येथे होणाऱ्या विश्‍वकरंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याची उत्कंठा वाढत असताना या दोन संघातील महासंग्रामाची पहिली लढाई आज (शनिवार) बांगलादेशमध्ये होत आहे. आशियाई करंडक स्पर्धेतील या प्रतिष्ठेच्या लढतीत भारताचे पारडे चांगलेच वरचढ आहे.

स्पर्धा कोणतीही असली तरी भारत-पाक सामन्यांवर नेहमीच प्रकाशझोत राहिलेला आहे. वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत-पाक आमनेसामने आले होते. त्यानंतर प्रथमच या दोन संघांत लढत होणार आहे. विश्‍वस्तरावरील स्पर्धांमध्ये पाकिस्तानने भारताला कधीही पराभूत केलेले नाही; परंतु आशियाई करंडकासारख्या स्पर्धांमध्ये दोघांनी एकमेकांवर कुरघोडी केलेली आहे. तरीही सध्याचा फॉर्म पाहता भारत पाकिस्तानच्या पुढे आहे.

आशियाई करंडक प्रथमच ट्‌वेंटी-20च्या स्वरूपात खेळली जात आहे त्यामुळे दोघांसाठी हा पहिलाच अनुभव असेल. ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणाऱ्या भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्धचीही मालिका जिंकली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी बांगलादेशला पराभूत करून लय कायम ठेवली आहे. ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये निकालाचे भाकीत करणे कठीण असल्याचे म्हटले जात असले, तरी भारताला विजयाची पसंती दिली जात आहे.

ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाचा अनुभव भारतीय संघाच्या पाठीशी आहे, तर पाकिस्तानचा संघातील खेळाडूंना त्यांच्या पाकिस्तान सुपर लीगचा अनुभव आहे. अनुभवाच्या तुलनेत फरक असला, तरी हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे रहातात तेव्हा दडपणाचा सामना जो चांगल्या पद्धतीने करु शकतो त्यालाच अधिक संधी असल्याचे बोलले जाते.

पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा संघ चांगलाच समतोल आहे. हार्दिक पंड्यामुळे मधल्या फळीला अधिक बळकटी आली आहे. विराट कोहली आणि युवराजसिंग फॉर्मात आले तर भारताला हरवणे पाकिस्तानला कठीण असेल. गोलंदाजीत 37 वर्षीय आशिष नेहराला सापडलेला सूर थक्क करणारा आहे, तर बुमराहची गोलंदाजी पाकिस्तानी फलंदाजांसाठी सावधगिरी बाळगणारी असेल कारण ते प्रथमच बुमराहचा सामना करणार आहेत. भारतीय गोलंदाजांना शाहिद आफ्रिदीला रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

बांगलादेशने या स्पर्धेसाठी तयार केलेल्या विकेटवर हिरवे गवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल; परंतु अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची याचा वस्तुपाठ रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून घालून दिला होता. त्यामुळे उद्या भारताची प्रमुख मदार रोहित शर्मावर असेल. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज वहाब रियाझ आणि नेहराप्रमाणे पुनरागमन करणारा महंमद सामी यांचाही कस लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *