“बहात्तरका अकाल तो भी ठीक था. हात को काम था. खाने को सातू मिलता था. दो रुपये मजुरी मिलती थी. वो दो रुपये कमाईसेही खूष होते थे. लेकीन अब बहोत बुरी हालत है. मजदुरका, गरीबका जिना बडा मुश्किल हो गया है साहब…‘‘ गवळीपुऱ्यातील इमाम हसन पप्पूवाले सांगत होते. मागील काही वर्षांपासून तळ ठोकून बसलेला आणि यंदा अधिकच भीषण झालेला दुष्काळ हा बहात्तरचा दुष्काळाच्या तुलनेत कसा वेगळा आहे, हे त्यांच्या शब्दाशब्दांतून स्पष्ट होत होते.
मजुरांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मजूर पुरवण्याचे पप्पुवाले यांचे काम. ते म्हणाले, “”गेल्या तीस वर्षांपासून मी हे काम करत आहे. शेतातील निंदणी, खुरपणी आदी कामांसाठी मजूर पुरवतो. माझ्याकडे 50-60 मजूर बायका आहेत. यंदाची परिस्थिती बिकट आहे. पाणीच नाही, विहिरींनाही पाणी नाही. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कामच नाही. सगळं ठप्प आहे. रोज सकाळी महिला मजूर येतात, आज हाताला काम मिळेल का? इमामभाई असे विचारतात. निराश होऊन परत जातात.‘‘
दुष्काळामुळे काम नसल्याने जगणं कठीण झालं आहे, असे इमामभाई सांगतात. जंगलातून लाकडे गोळा करून बाजारात विकायची आणि 30-50 रुपये मिळतात, त्यावर भागवायचे असा क्रम सध्या सुरू आहे. बहात्तरच्या दुष्काळात परिस्थिती वेगळी होती. ते म्हणतात, “”त्या वेळी शासनाची रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू होती. लोकांच्या हाताना काम मिळालं. खायला सातू देत. आजकालच्या पोरांना सातू काय ते माहितीही नाही. त्या वेळी रोजगार हमीत रस्त्याची कामं केली. पसरणी-धामणी रस्ता, बिलखेडा-शाह रस्ता, बिलखेड्यातलं नाला रुंदीकरण या कामांवर मजूर म्हणून काम केलं. दोन-तीन रुपये मजुरी मिळायची. आता मात्र महागाईने अडचण केली सगळ्यांची. त्यात हाताला कामही नाही. कसा जगणार माणूस? शासनानं काय करावं, हे मी काय सांगणार? पण शासनानं कामं सुरू करावीत, हाताला काम द्यावे, चांगली मजुरी द्यावी. काहीही कामं सुरू करा ही एकच सरकारला विनंती आहे. ‘‘
यंदा सरकार दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडतेय, हे वास्तव या दुष्काळ दौऱ्यात ठिकठिकाणी स्वच्छपणे दिसत आहे. रोजगार हमीच्या कामांची संख्या वाढवली तर किमान तात्पुरता दिलासा मिळू शकतो. यासंदर्भात सरकारी पातळीवरच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती याचा काही ताळमेळ दिसत नाही. लोकांच्या हाताला काम पाहिजे ही तातडीची गरज आहे.