‘२३ वर्ष मी ज्या दिवसासाठी मरत होतो. तो सुटकेचा दिवस अखेर आज आला, असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने व्यक्त केले. येरवडा तुरुंगातून गुरूवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याची कायमची सुटका झाली.
संजय दत्तची सुटका झाल्यानंतर त्याने सर्वप्रथम मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याची वांद्रे येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तो बोलत होता.
‘मी १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेलो नाही, शस्त्रास्त्र कायद्यानुसार दोषी ठरलो आणि त्याची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडलो आहे. न्यायालयाने दहशातवाद्याचा शिक्का पुसला तोच माझ्यासाठी मोठा दिलासा आहे,’ असे मत त्याने यावेळी व्यक्त केले.
‘जेलमध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे काम केले, काही दिवस जेल प्रशासन चालवत असलेल्या रेडिओ स्टेशनवर जॉकी म्हणून काम केले, असे त्याने सांगितले.
‘मान्यता माझी शक्ती असून खूप चांगली मैत्रिण आहे, तिने खूप काही सहन केले आहे, असे सांगत त्याने ‘माझे वडिल असते तर आज आनंद झाला असतांना त्यांना माझी सुटका झाल्याचे पहायचे होते, आज त्यांची खूप आठवण येत आहे, अशी भावना व्यक्त केली.
‘या दिवसाची मी खूप वाट पहात होतो, चार दिवस जेवन केले नाही, तर काल रात्री झोपलो नसल्याचेही संजय यावेळी म्हणाला. संजय तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने ध्वजाला सलाम केले यावर त्याला विचारले असता त्याने ‘मी देशभक्त आहे, भारतावर माझे प्रेम आहे, म्हणूनच तुरुंगातून बाहेर आल्यार मी ध्वजाला सलाम केला,’ असे त्याने सांगितले.
