महापालिकेच्या १५०० सुरक्षारक्षकांचे वेतन दिरंगाईमुळे तीन महिन्यांपासून रखडले आहे. महापलिकेच्या विविध विभागांत कमी वेतनावर हे सुरक्षारक्षक काम करत आहेत. ज्या ठेकेदारांमार्फत सुरक्षारक्षक काम करतात, त्यांची बिले मंजूर करण्यास मुख्य सभेने उशीर लावल्याने सुरक्षारक्षकांचे वेतन रखडले आहे.
सुरक्षारक्षकांच्या वेतनाचा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याने त्यांचे वेतन रखडत आहे. मुख्य सभेकडून सुरक्षारक्षकांच्या वेतनाची रक्कम कंत्राटदाराला देण्याचे उशिराने मंजूर करण्यात आले आहे. खासगी ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक करण्यात येते. त्यांना दर महिना किमान १२ हजार रुपये वेतन द्यावे, असे पालिकेने करारात नमूद केले आहे; मात्र ठेकेदारांकडून सुरक्षारक्षकांना खूप कमी वेतन दिले जाते. आयुक्तांनी सुरक्षारक्षकांच्या बँक खात्यांत पगार जमा करण्याचे निर्देश दिले होते.