मध्यरात्रीही मदतीला धावेन! मोदी

कोणत्याही धर्माविरुद्ध भेदभाव किंवा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी तंबी रा. स्व. संघासह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मुस्लिमांसाठी काय पण’ करायची तयारी दाखवली आहे. रात्री १२ वाजता जरी तुम्ही माझं दार ठोठावलंत, तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन, असं वचन त्यांनी मंगळवारी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिलं. स्वतःला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवणाऱ्या मोदींच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत असलं, तरी ‘धर्मनिरपेक्ष पंतप्रधान’ अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न मानला जातोय.

देशातील १२५ कोटी जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडून राजकारण करण्यावर माझा विश्वास नाही आणि धार्मिक भेदभावाची भाषा मी कधीही बोलणार नाही, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली. अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांच्या नेतृत्वाखालील ३० मुस्लिम सदस्यांच्या शिष्टमंडळनानं मोदींची काल ‘शब्बे बारात’च्या रात्री भेट घेतली, तेव्हा ४५ मिनिटांच्या चर्चेत मोदींनी त्यांना विकासाची खात्री दिली. विरोधकांची टीका ऐकून माझं मूल्यांकन करू नका, तर माझं काम पाहून माझी पारख करा, असं आवाहनही त्यांनी मुस्लिम नेत्यांना केलं.

अल्पसंख्याक – बहुसंख्याकांच्या राजकारणानं आजवर देशाचं मोठं नुकसान झालंय. पण आता देश विकासाच्या दिशेनं काम करतोय. रोजगार आणि विकास हे प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर असल्याचं मत पंतप्रधानांनी मांडलं. तेव्हा, मुस्लिमांना अनेक योजनांचा फायदा मिळत नसल्याची तक्रार काही मंडळींनी केली. त्यावर, तुमच्या समस्या आम्हाला ठाऊक आहेत आणि तुमच्या सशक्तीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असं मोदींनी नमूद केलं. कौशल्य विकासासाठी सरकारनं हाती घेतलेल्या कार्यक्रमाची त्यांनी माहिती दिली.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुस्लिम नेत्यांनी मोदी सरकारच्या कामाबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल आणि मोदींनी दिलेल्या आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त केलंय. रात्री १२ वाजता दार ठोकलंत, तरी मी तुमच्या मदतीसाठी हजर असेन, असं वचनच त्यांनी दिल्याचं एका नेत्यानं सांगितलं. मुस्लिम तरुणांच्या एका हातात कुराण आणि एका हातात कॉम्प्युटर देण्याचा मोदींचा विचार स्तुत्य असल्याची दादही त्यांनी दिली.

त्याचवेळी, मुस्लिमांना आता व्होट बँकेचं राजकारण नको आहे, त्यांना विकासात रस आहे आणि त्यासाठी सहकार्य करण्यास ते तयारही असल्याचं पीएमओच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय.

पंतप्रधान मोदींनी मुस्लिमांच्या मदतीसाठी हात पुढे करणं, अल्पसंख्याकांना धीर देणं देशाच्या हिताचं असलं तरी ते हिंदुत्ववादी संघटनांना कितपत पटेल, याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे मोदींना आप्त-स्वकीयांच्या नाराजीला, विरोधाला सामोरं जावं लागू शकतं, याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *