बंगळुरू, दि. १९ – आयपीएलच्या सामन्यादरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबलेला असताना प्रेयसी अनुष्का शर्माशी गुफ्तगू करून नियम भंग करणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने समज दिली आहे.
रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर बँगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. त्यावेळी विराट व्हीआयरी बॉक्समध्ये जाऊन अनुष्काशी संवाद साधताना दिसला. त्या दोघांच्या भेटीची ही छायाचित्र प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यांनी टिपली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
लाईव्ह सामन्यांदरम्यान कोणत्याही खेळाडूला संघ सहका-यांशिवाय इतर कोणालाही भेटण्याची वा त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी नसते. स्पॉट फिक्सिंग होऊ नये यासाठी बीसीसीआयने हा नियम बनवला आहे. मात्र असे असतानाही विरटाने नियमाचा भंग करून अनुष्काशी संवाद साधला. त्यानंतर त्याला बीसीसीआयने समज दिली आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक सुरक्षा समितीने प्रत्येक खेळाडूवर मैदानावर तसेच हॉटेलमध्येही बारकाईने लक्ष ठेवले आहे.