शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रायगड महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारपासून या महोत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात झाली होती. यावेळी ऑनलाईन बुकिंगव्यतिरिक्त महोत्सवाला भेट देण्याकरिता आलेल्या पर्यटकांना मात्र रायगड रोपवेपासूनच परत फिरावे लागले. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून ऑनलाईन बुकिंग न केल्यामुळे त्यांनादेखील किल्ल्यावरील सादर कलाप्रकारांपासून दूरच राहावे लागले. रविवारी हा महोत्सव संपल्यानंतर अनेक पर्यटकांनी महोत्सवात सहभागी होता न आल्यामुळे तसेच महोत्सव पाहता न आल्याने ऑनलाईन बुकिंगबाबत नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी रायगड महोत्सवास प्रारंभ झाला. मुळातच या महोत्सवाचे नियोजन करताना महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिका, कार्यक्रमांचे नियोजन आणि वेळापत्रक लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडले होते. उद्घाटन झाले तरीदेखील निमंत्रण पत्रिका शासकीय आधिकारी, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटक या कार्यक्रमाच्या माहितीपासून कोसो दूर राहिले.
शासनाने या महोत्सवासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केली होती. ही वेबसाईट एमटीडीसीच्या साईडला लिंक करण्यात आली होती. यामुळे ऑनलाईन बुकिंग करणा-यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. मात्र ही वेबसाईटदेखील जाहिरातीच्या माध्यमातून शिवप्रेमी आणि पर्यटकांपर्यंत शासन पुरेशा वेळेत पोहोचवू शकले नाही. अगदी सुशिक्षित पर्यटकांनादेखील ही बुकिंग कशी करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे या बुकिंगबाबत ग्रामीण भागातील शिवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये अनभिज्ञता दिसून आली. महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, पोलादपूर ही प्रमुख शहरे वगळली तर इतर परिसर हा ग्रामीण भाग आहे.
तालुक्यातील निम्म्या अधिक गावात मोबाईल पोहोचला असला तरी निम्म्याहून अधिक नागरिक इंटरनेटपासून दूरच आहेत. यामुळे या महोत्सवाकरता ऑनलाईन बुकिंग कशी करायची, असा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर निर्माण झाला होता.त्यामुळे महोत्सवापर्यंत पर्यटकांची निराशा झाली. रायगड महोत्सवाच्या निमित्ताने विनाबुकिंग आलेल्या पर्यटकांना रायगड रोपवेजवळच अडवले जात होते. याठिकाणी विनाआरक्षित पर्यटकांना रायगड ‘रोपवे’मध्ये प्रवेश नाकारण्यात येत होता. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये नाराजी पसरली होती.