भारत-पाक सीमेवर ‘लेझर’ किरणांची भिंत

भारत-पाक सीमेवर ‘लेझर’ किरणांची भिंत

भारत आणि पाकिस्तान दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक ठिकाणी कुंपण नाही. त्याचा फायदा उचलत दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात माजवतात. पठाणकोट हल्ल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून सीमेवरील त्रुटी सुधारण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्या भागात कुंपण शक्य नाही तेथे लेसर किरणांच्या भिंती उभारण्यात येणार आहेत. यामुळे दहशतवाद्यांना सीमा ओलांडणे अशक्य बनणार आहे.

पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याकरता अत्यंत आधुनिक अशी लेसर किरणांची भिंत उभारण्याच्या या प्रस्तावास केंद्रीय गृहमंत्रालयाने प्राधान्य दिले आहे. विशेष करून पंजाब प्रांतामधील पाणथळ जागांवर व ज्या भागातून घुसखोरी शक्य होईल या भागात या लेझर भिंती उभारल्या जातील. लेसर किरणांच्या या भागामधून घुसण्याचा प्रयत्न कोणी केल्यास मोठा भोंगा वाचतो. त्यामुळे सुरक्षा दलांना घुसखोरीची सूचना देता येणे शक्य होईल.

सध्या भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील पाच-सहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लेसर किरणांची भिंत निर्माण करण्यात आली आहे. पठाणकोट येथे हल्ला घडविलेले दहशतवादी घुसल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या ठिकाणी लेसर भिंत बसविण्यात आलेली नव्हती. भविष्यात घुसखोरीचे संभाव्य भाग निश्चित करून तेथे ही भिंत उभारली जाईल.

पठाणकोट हल्ल्यातील जैश-ए-मोहम्मदचे सर्व दहशतवादी बामीयाल येथील उज्ज नदी पार करून भारतात घुसले होते. विशेष म्हणजे या भागात शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी खास कॅमेरा आहे. तो १३० मीटर लांबीच्या नदी पात्रावर देखरेख ठेवतो. मात्र, त्या दिवशी या कॅमे-यात या घुसखोरीची नोंद झाली नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे या नदीच्या पात्रात पाणी नसताना या दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली. त्यावेळी सीमा सुरक्षा दलाचे जवान जागेवर नसल्याचे आढळून आले. बामीयाल हा भाग अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी प्रसिद्ध नाही. तेथे तीन ते चार वर्षात अंमली पदार्थ जप्त केलेले नाहीत.

हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पठाणकोटला भेट दिली. तत्पूर्वी सीमा सुरक्षा दलाने सीमा भागातील सुरक्षेतील त्रुटी भरून काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सीमा सुरक्षा दलाने पंजाब सीमेवर अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या काळात नदीत गस्त घालण्यास सुरुवात केली.

लेझर भिंत म्हणजे काय?

घुसखोरी होणा-या सीमावर्ती भागात लेझर किरणांचे अडथळे उभारले जातात. ही अडथळ्यांची भिंत अदृश्य असते. या भिंतीला एका डिटेक्टर यंत्रणेला जोडले जाते. या लेझर भिंतीतून कोणीही व्यक्ती गेल्यास तातडीने भोंगा वाजायला लागतो. अधिक शक्तिशाली लेझर किरणे एखाद्याला जखमीही करू शकतात. या लेझर भिंतीच्या सहाय्याने घुसखोरी रोखता येते. ही संकल्पना चित्रपट, व्हीडिओगेममध्ये मोठय़ा प्रमाणात वापरली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *