दिल्लीत दोन आठवडे राबविलेल्या सम-विषम योजनेचा आज शेवटचा दिवस होता. दिल्ली सरकारने ही योजना पूर्णपणे यशस्वी झाल्याचा तसेच या योजनेमुळे 30 टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी झाल्याचा दावा केला आहे.
दिल्ली सरकार उद्या (शनिवारी) या योजनेचे यश साजरे करणार आहे. दरम्यान, या योजनेमुळे आम्हाला वाहतुकीच्या मुद्द्यावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, वाहतुकीची कोंडी अतिशय कमी झाली, असे दिल्लीतील नागरिकांनी एका सुरात सांगितले. 15 जानेवारीनंतर ही योजना संपुष्टात आल्यानंतर पुन्हा वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागेल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये उद्या या योजनेचे यश साजरे करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, 18 जानेवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या योजनेचा आढावा घेतील आणि पुढील निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.