राज्यावर यंदाही दुष्काळाचे ढग गडद

राज्यावर यंदाही दुष्काळाचे ढग गडद

गतवर्षीचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे हताश झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतानाच राज्याच्या कृषी विभागाने त्यांच्या उरल्यसुरल्या आशेवरही पाणी फेरणारी बातमी आणली आहे़ एल निनोच्या प्रभावामुळे जून, जुलै आणि आॅगस्ट अशा नेमक्या पेरणीच्या मोसमातच पाऊस ओढ देणार असल्याने राज्यावर यंदाही दुष्काळाचे गडद ढग घोंघावत आहेत.

हवामान खाते, पंचांग आणि ग्रामीण भागातील घटमांडणीच्या सूत्रानुसार यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते़ त्या आशेवर असलेल्या बळीराजाने बी-बियाणांची तजवीज करून ठेवली होती, मात्र ऐन मृग नक्षत्राच्या तोंडावर कमी पावसाची कडू वार्ता आली आहे़

येत्या आठ ते पंधरा दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी हा पाऊस बेभरवशाचा राहणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी करताना घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाचे सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे़ यंदा मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. तो सरासरीच्या ९५ टक्के इतका असेल़ कोकण आणि मराठवाड्यात मात्र तो सर्वात कमी असेल़, असा अंदाज कृषी विभागाने ‘मॉन्सून मॉडेल’वरून काढला आहे़ साबळे यांच्या मते मराठवाड्यात ९०, कोकणात ९०.५, विदर्भात ९६, उत्तर महाराष्ट्रात ९७ व पश्चिम महाराष्ट्रात ९९.८ टक्के पावसाचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *