देशामध्ये मे आणि जून या महिन्यात कमाल तापमानात वाढ होते; मात्र यंदा बहुतांश भागांमध्ये तापमान खूपच वाढले होते आणि त्याचा परिणाम पोल्ट्री क्षेत्रावर झालेला दिसून आला. कोंबड्यांच्या संख्येचा विचार करता, या उद्योगामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर कोंबड्या जगू शकत नाहीत. अनेक भागांमध्ये गेल्या महिन्यात तापमान सातत्याने ४२-४३ अंश सेल्सिअसच्या पुढे होते. त्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ‘पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण दोन-तीन टक्क्यांपर्यंत असते; मात्र गेल्या महिन्यात हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत वाढले आहे,’ याकडे ‘वेंकीज्’चे उपमहाव्यवस्थापक प्रसन्न पेडगावकर यांनी लक्ष वेधले. देशभरात १.७ कोटी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे, चिकनच्या दरामध्येही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ९५ रुपये किलो दराने मिळणाऱ्या ब्रॉयलर चिकनच्या दरात ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
पोल्ट्री उद्योगामध्ये आघाडीवर असणाऱ्या तेलंगण आणि आंध्र प्रदेशला उन्हाचा मोठा फटका बसला आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. त्यातच, मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान कमी व्हायला हवे, अन्यथा आणखी काही लाख कोंबड्यांचा बळी जाईल, असे सांगून पेडगावकर यांनी चिंता व्यक्त केली.
खाद्यान्न पुरवठादार अडचणीत
कोंबड्यांच्या मृत्यूचा स्वाभाविक परिणाम पोल्ट्रींना खाद्यान्न पुरवणाऱ्या कंपन्यांवर झाला आहे. मक्याच्या पदार्थांचा प्रामुख्याने पोल्ट्रींना पुरवठा होत असतो. गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये या खाद्यान्नाची मागणी ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘कोमराल फीड्स अँड फूड्स’चे सरव्यवस्थापक कृष्ण चरण यांनी सांगितले. यातच, अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील कंपन्यांनी उत्पादनात वाढ केल्याने, या खाद्यान्नाचे दर पाच वर्षांतील किमान पातळीवर घसरले आहेत. त्यामुळे खाद्यान्न पुरवठादार अडचणीत सापडले आहेत.
मागणी वाढली
महाराष्ट्र सरकारने गोमांसावर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. बर्ड फ्लूमुळे मागणी घसरल्यानंतर, त्यातून सावरण्याची संधी मिळाली होती. आता वाढत्या तापमानाचा फटका उद्योगाला बसला आहे. त्यामुळे चिकनच्या दरामध्ये वाढ होत असून, यामुळे उद्योग अडचणीत येत असल्याचे पोल्ट्रीचालक कल्याण असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष वसंत कुमार यांनी सांगितले.