२०१५ या वर्षाची सुरुवात काहीशी धीम्या गतीने झाली. २०१४च्या अखेरीस आलेल्या चित्रपटांच्या हँगओव्हरमधून चित्रपटसृष्टी पूर्णपणे सावरली गेली नव्हती. त्यामुळे त्या वर्षी शिल्लक राहिलेले चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला आले. ‘मुंबई कॅन डान्स साला’ हा या वर्षीचा पहिला चित्रपट होता.
असिम शर्मा, प्रशांत नारायणन, अदित्य पंचोली असे कलाकार असलेला हा चित्रपट फार काही चालला नाही. त्याच्यापाठोपाठ ९ जानेवारी रोजी सोनाक्षी सिन्हा हिचा ‘तेवर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एका वेगळया कथानकाच्या व उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये चालत आलेल्या काही वास्तव घटनांवरचा हा चित्रपट होता.
बाहुबली राजकारणाचा त्रास कधी कधी सर्वसामान्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आले. मनोज वाजपेयी याची विलक्षण भूमिका व अर्जुन कपूरच्या अभिनयाने हा चित्रपट विशेष ठरला.
बिपाशा बासूच्या ‘अलोन’ या रहस्यमय चित्रपटाने काही समीक्षकांना जरी सुखावलं असलं तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने विशेष असे काही केले नाही. १६ जानेवारी रोजी भारतीय चित्रपटांच्या इतिहासातल्या एका विलक्षण चित्रपटाने समीक्षक व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘आय’ हा दिग्दर्शक शंकर याच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले. या चित्रपटातून विक्रम आणि अॅनी जॅक्सन ही पाश्चात्य अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत आली.
मूळ तमीळ असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने मोठं यश मिळवलं. रहस्य, विज्ञान, श्रंगार व विभत्स रसाचे एक अनोखे मिश्रण त्याचबरोबर चीनमधल्या विविध नेत्रदीपक अशा लोकेशनवर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. आय चित्रपटाने भारतीय चित्रपट हॉलिवुडच्या तुलनेत कुठेही कमी नाही हे दाखवून दिले होते.
याच आठवडयात ‘शराफत गई तेल लेने’ हा तुलनेने लहान असलेला चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटात एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक शंभर कोटी रुपये आल्यानंतर त्याच्या जीवनात काय काय होते याची कथा सांगण्यात आली होती. गुरमित सिंग दिग्दर्शित या चित्रपटाने लहान चित्रपटही जर चांगल्या कथेचा असला तरी तो स्पर्धेत टिकून राहतोच हे दाखवून दिले.
२३ जानेवारी रोजी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटाने या वर्षीच्या यशाला सुरुवात करून दिली. एका गुप्तहेराच्या जीवनावरच्या या चित्रपटात दहशतवादाच्या विरोधातली एक लढाई दाखवण्यात आली होती. नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखालील या चित्रपटात अक्षय कुमार, डॅनी, अनुपम खेर अशी तगडी स्टार कास्ट होती. केके मेननची एक वेगळी भूमिकाही लक्षात राहण्यासारखी होती.
विलक्षण कल्पनाशक्ती व गुप्तहेरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट चांगलाच गाजला. क्राईम पेट्रोल या टीव्ही मालिकेतल्या एका गुन्हेगारी कथेची पार्श्वभूमी असलेली ‘डॉली की डोली’ हा चित्रपटही याच आठवडयात प्रदर्शित झाला. लग्न करून त्याच रात्री नव-याकडच्या सगळय़ांना लुटणा-या एका अतिचालाख अशा मुलीची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली होती. सोनम कपूरचा विलक्षण अभिनयही आशादायक ठरला. या चित्रपटात तिच्याबरोबर राजकुमार राव, मनोज जोशी यांच्याही भूमिका जबरदस्त झाल्या.
३० जानेवारी रोजी केके मेनन व टिस्का चोप्रा यांचा अभिनय असलेला ‘रहस्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एका हत्याकांडाचा जबाबदार तपास व त्यावरचं विलक्षण रहस्य असा मेळ या चित्रपटातून दिग्दर्शक मनीष गुप्ता याने सांभाळला होता. ‘खामोशिया’ हा ओढून ताणून रहस्य निर्माण करणारा व एका लेखकाच्या जीवनावरचा चित्रपटही याच आठवडयात आला.
रहस्यने बॉक्स ऑफिसवर थोडीफार कमाई केली असली तरी खामोशिया मात्र बॉक्स ऑफिसवर मूकच राहिला. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण दारा याने केलं होतं. फेब्रुवारी महिना उजाडला तो एका मोठया षटकाराने. अमिताभ बच्चन व धनुष यांचा षमिताभ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला.
वेगळया पद्धतीचं कथानक, आर. बाल्कीची वेगळया प्रकारची हाताळणी या सा-या गोष्टींनी हा या वर्षातला एक वेगळा असा चित्रपट ठरला. अमिताभ बच्चन यांनी आपली वेगळी भूमिका साकारून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस आपल्या नावावर चालतो हे सिद्ध केले. विक्रमजित सिंग याचा ‘रॉय’ हा सिनेमा पुढच्याच आठवडयात प्रेक्षकांच्या समोर आला. फार गाजावाजा करून आलेला हा चित्रपट मात्र सपशेल चीत झाला. त्याला समीक्षकांनी तर झोडलेच, त्याचबरोबर प्रेक्षकांनीही रणवीर कपूरकडे पाठ फिरवली.
२० फेब्रुवारी रोजी आलेल्या ‘बदलापूर’ या चित्रपटाने युथफुल सिनेमाचे एक नवे दालनच हिंदी चित्रपट सृष्टीत सुरू केले. वरुण धवन, नवाजुद्दीन सिद्दिकीसारख्या अभिनेत्यांनी व श्रीराम राघवन याच्या दिग्दर्शनाने नव्या पिढीकडून एक आशेचा नवा प्रकाश दिसायला लागला. या चित्रपटानेही चांगलेच यश मिळवले. यानंतरच्या काळात अब तक छप्पन भाग २, दम लगाके हैशा, हे ब्रो, असे काही चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले तरी या काळात सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १३ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘एनएच १०’ या चित्रपटाने.
एक विलक्षण असा थ्रीलर चित्रपट म्हणून हा चित्रपट रसिकांच्या लक्षात राहिला. २० मार्च रोजी आलेल्या ‘हंटर’ या चित्रपटाने एका बाजूला एक वाद जरी आणला असला तरी दुस-या बाजूला हा चित्रपट लक्षात राहिला तो सई ताम्हणकर व राधिका आपटे यांच्या बोल्ड अशा अभिनयाने. यानंतरच्या काळात विश्वचषकाच्या निमित्ताने हिंदी चित्रपट सृष्टीत एक प्रकारचं मंदीचं वातावरण राहिलं. या काळात अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शित करण्याचं टाळलेलं दिसून आलं.
विश्वचषकानंतर मग ३ एप्रिल रोजी डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी हा सुशांतसिंग राजपुतचा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहरूख खाननंतर टीव्हीच्या छोटया पडद्यावरून मोठया पडद्यावर आलेला हा कलाकार ब-यापैकी यशस्वी झाला. त्याच्या कामाचं चांगलं कौतुकही झालं असलं तरी हा चित्रपट म्हणावा तितका यशस्वी झाला नाही.
सनी लिओनचा ‘एक पहेली लीला’ हा काहीसा रहस्यपट व काहीसा बोल्ड असलेला बिनडोक चित्रपटही या वर्षाच्या उतरार्धात १० एप्रिल रोजी झळकला. मिस्टर एक्स हा विज्ञानाशी संबंधित असा चित्रपट यातल्या इमरान हाश्मीच्या भूमिकेमुळे काहीसा गाजला तरी त्यालाही हवे तितके यश मिळाले नाही.
१ मे रोजी अक्षय कुमारचा एक वेगळया धाटणीचा ‘गब्बर इज बॅक’ हा चित्रपट झळकला असला तरी त्याच्या आधीच्या बेबी या चित्रपटाइतके काही यश त्याला मिळवता आले नाही. ८ मे रोजी अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ हा एक वेगळयाच धाटणीचा व सर्वागसुंदर असा चित्रपट आला.
दीपिका पडुकोण हिच्या अभिनायचीही यानिमित्ताने तारीफ झाली. अनुराग कश्यप याच्या बॉम्बे वेलवेट या चित्रपटाकडून फार मोठया अशा- अपेक्षा होत्या मात्र हा चित्रपटही त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. बॉक्स ऑफिसवरच या वर्षातलं पहिलं लक्षात राहणारं यश जर कुणी मिळवलं असेल तर ते ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ या चित्रपटाने. कंगणाने या चित्रपटातल्या आपल्या भूमिकेच्या जोरावर एक मोठी प्रेक्षकसंख्या थिएटपर्यंत खेचून आणली.
जून महिन्यात आलेल्या जोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाने एका ब्लॉकबस्टरची आशा निर्माण केली होती मात्र शेवटी ती आशाही हवेतच विरून गेली. दिग्दर्शक मोहित सुरी याच्या ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाचं व या चित्रपटातल्या इमरान हाश्मी, विद्या बालन व राजकुमार राव यांच्या अभिनयाचं कौतुक झालं असलं तरी याही चित्रपटातला म्हणावं तितकं यश मिळू शकलं नाही.
वर्षाच्या सुरुवातीपासून एका मोठया ब्लॉकबस्टर सिनेमाची गरज पूर्ण केली ती १० जुलै रोजी आलेल्या बाहुबली या चित्रपटाने. आजपर्यंतच्या भारतीय चित्रपटांच्या निर्मितीतला सर्वात महागडा चित्रपट अशी ओळख असलेल्या या चित्रपटाने आपल्या विलक्षण दर्जाने समस्त प्रेक्षकांना आपल्याकडे अक्षरश: खेचून घेतले.
कोणत्याही भारतीय चित्रपटाची आसेतु हिमाचल अशी चर्चा होण्याचं भाग्य या चित्रपटाला मिळालं. एस.एस.राजामौलीने भारतीय प्रेक्षकांना दिलेली ही एक आगळीवेगळी अशी भेट ठरली.
त्याच्यापाठोपाठ १७ जुलै रोजी आलेल्या बजरंगी भाईजाननेही विक्रमी उत्पन्न मिळवलं. या चित्रपटाच्या यशात एक महत्त्वाची गोष्ट घडली. या आधी सलमान खानचे चित्रपट केवळ त्याच्या नावावर खपले जायचे. यावेळी पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या चांगल्या कथानकाचा फायदा सलमानला मिळाला.
गेल्या सहा महिन्यांपासून शोधात असलेल्या ब्लॉकबस्टरची प्रतीक्षा या दोन चित्रपटांनी संपवली. त्यापाठोपाठ आलेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटानेही या लाटेत आपला वेगळा ठसा उमटवला. या चित्रपटाची कथा व त्या चित्रपटाचे सादरीकरण यामुळे अजय देवगणचा या वर्षातला तो एक सर्वाधिक यशस्वी असा चित्रपट ठरला. त्याआधी २४ जुलैला आलेल्या ‘मसान’ या चित्रपटाने एक चांगला चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची अपेक्षाही पूर्ण केली.
७ ऑगस्टला आलेल्या बंगिस्तान या रितेशच्या चित्रपटालाही ब-यापैकी यश मिळाले. अक्षय कुमारच्या ‘ब्रदर्स’ या चित्रपटालाही खासकरून तरुण प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली.
भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक बायोपीक होऊन गेले. त्यातल्या मॉझी या एका माणसाने फोडलेल्या एका डोंगराची अनन्यसाधारण अशी कथा या वर्षी आली ती मॉझी या चित्रपटाच्या माध्यमातून. हा चित्रपट दोन्ही गोष्टींनी गाजला. एक तर माँझी यांचं कार्य व दुसरं म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी याचा अभिनय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार मोठे यश मिळवले नसले तरी अशा प्रकारच्या चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक उचलून धरतात हे मात्र दाखवून दिले. ही गोष्ट छोटी डोंगराएवढी रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली.
अभिषेक बच्चन व असीन यांच्या ऑल इज वेल या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा म्हणावा तितका पाठिंबा मिळाला नाही. सैफ अली खानचा ‘फँटम’ हा चित्रपट तर बॉक्स ऑफिस डिझास्टर ठरला. ‘वेलकम बॅक’ या चित्रपटालाही म्हणावं तितकं यश मिळू शकलं नाही. मधुर भांडारकरच्या ‘कॅलेंडर गर्ल’ या चित्रपटाची चर्चा जरी झाली असली तरी या चित्रपटालाही जेमतेमच यश मिळाले.
ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटाचीही अवस्था साधारणच राहिली. ‘तलवार’ या चित्रपटाला मात्र समीक्षकांनी चांगलेच उचलून धरले. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट ब-यापैकी चालला. ९ ऑक्टोबर रोजी आलेल्या ‘जज्बा’ या चित्रपटाने ऐश्वर्या राय हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. हा एक प्रगल्भ असा सिनेमा ठरला.
या महिन्यात आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने रसिकांना एक चांगला चित्रपट पाहिल्याचा सुखद असा धक्का दिला. तर ‘शानदार’ या शाहीद कपूरच्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोके उठवले. ‘मै और चार्ल्स, ‘यारा सिली सिली’ यासारख्या चित्रपटानंतर आलेल्या दीपिका पडुकोणचा ‘तमाशा’ही रसिकांना चांगलाच भावला.
या वर्षाची अखेर झाली ती दोन मोठया चित्रपटांनी. हे वर्ष संपेपर्यंत या दोघांमधला संघर्ष हा बॉक्स ऑफिसवर सुरूच राहणार आहे. त्यात आज मितीस तरी संजय लीला भन्सालीच्या ‘बाजीराव मस्तानी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे.
शाहरूख खानच्या दिलवालेला त्याने उत्पन्नात तरी मागे टाकलेले आहे. बाजीराव मस्तानी हा माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चालला. हे वर्ष अशाच अनेक लहान-मोठया संघर्षाचं राहिलं असलं तरी नेहमीप्रमाणे याही वर्षी चित्रपट व त्याच्या तंत्रात अधिकाधिक प्रगती दिसून आली.