मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अनाकलनीय अशा संकल्पनांपैकी एक प्रमुख संकल्पना म्हणजे ‘देव’. अनेक संतांनी चराचरात देव आहे, असं सांगितलं; पण मनुष्य जन्म मिळूनही आम्हाला देव कोण आणि तो कोठे आहे, याचा ठावठिकाणा लागलेला नाही. लहानपणी आईने जो दगड दाखवला, त्या दगडालाच लोकांनी देव मानलं. ‘जर तू जेवला नाहीस तर देवबाप्पा कान कापेल..’ असं म्हणून आईने जी भीती दाखवली ती आजही आपल्यामध्ये कायम आहे. काही जण देवाला भीतीपोटी मानतात तर काही इतरांकडे पाहून देव पुजतात. जगात प्रत्येक ठिकाणी देव आहे, असं संत म्हणतात. हे बहुदा चुकीचं आहे की काय असा संभ्रम आपल्याला अनेकदा होत असावा. आज देव नेमका कुठे आहे आणि कसा आहे, इथूनच सुरुवात होते. काही म्हणतात, स्वत:तला गर्व संपवला की, देवत्वाची प्राप्ती होते. देवत्व मिळवण्यासाठी आणखी कोणते पर्याय आहेत का? संतांनी कशाला देव म्हटलं आहे, विविध संतांची ‘देवा’विषयी असलेली मतं आज जाणून घेऊ या.
संत तुकडोजी महाराजांचं ‘देव’विषयीचं मत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेतल्या सुरुवातीच्याच ओवीत ‘देव काय आहे आणि कोठे आहे’, याचं उत्तर देतात.
। ओम नमोजी विश्वचालका। जगद्वंद्या ब्रह्मांडनायका।
। एकचि असोनि अनेका। भासशी विश्वरूपी।
महाराज यात म्हणतात, हे जगत वंदनीय प्रभो, तुला साष्टांग दंडवत. हे सृष्टीच्या पालनकर्त्यां, ब्रह्मांडनायका तुला नमस्कार असो. तू विश्वरूपात चराचरात असून देखील एकच आहेस, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भासतोस, लोकांना अनेक रूपात तुझे दर्शन आणि प्रत्यय आणून देतोस, तुला दंडवत.
वरील ओवीत महाराज जगतचालक प्रभूला वंदन करतात आणि लोकांना सांगतात की, लोकहो मी अनेक रूपात असलेल्या एकाला वंदन केले आहे. कारण या चराचरात प्रभू आहेत; पण जरी तो विविध ठिकाणी, विविध रूपात दिसत असला तरी माझ्याप्रती तो एकच आहे. कारण देव एक आहे, पण अवतार अनेक आहेत. त्यामुळे लोक देव शोधताना, त्याला अवतारानुरूप पुजतात आणि खरा देव पुजायचाच राहून जातो, जो चराचरात आहे.
महाराज खालील ओवीत देव कोठे आहे, हे लोकांना सांगतात. ते म्हणतात, विश्व चालवण्यासाठी हे भगवंता तू प्रत्येक ठिकाणी आहेस.
। आपणचि झाला धराधर। उरला भरोनि महीवर।
। अणूरेणूतूनी करीशी संचार। विश्वनाटक नटावया।
महाराज म्हणतात, हे भगवंता तूच या जगाची निर्मिती केली आहेस, या भूतलावर काय तिन्ही लोकांमध्ये तू नाहीस, असं एकही स्थान नाही. तू अणूरेणूच्या सूक्ष्म कणाकणात आहेस, भूतलावरील घटाघटात आहेस, विश्व सजवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीची पूर्तता होण्यासाठी तू प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेस. विश्व निर्मिणाराही तू आणि विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्येही तूच आहेस. तू नाहीस, अशी एकही जागा नाही. पण तू चराचरांत असून देखील सापडत नाहीस, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही.
संत तुकडोजी महाराज याठिकाणी म्हणतात की, लोक मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये देव शोधतात. काही तर दगडाचे विविध आकार तयार करून त्याला देव मानतात; पण ज्याने विश्वाची निर्मिती केली आहे, तो प्रत्येक ठिकाणी सारखाच आहे. उगाच त्याला भिन्न भिन्न रूपं देऊन स्वत:ची आणि सगळ्यांचीच दिशाभूल करण्यात काय अर्थ आहे?
। आपणचि मंदीर, मूर्ती, पुजारी। आपणचि पुष्प होऊनी पूजा करी।
। आपणचि देवरूपे अंतरी। पावे भक्तां।
वरील ओवीत महाराज म्हणतात की, भगवंतच मंदिर आहे, तोच मूर्ती आहे, तोच पुजारी आणि प्रत्येकाच्या ठिकाणी वास करणारा आहे, मग देव नेमकं म्हणायचं कोणाला? कारण जे-जे दिसतं, ते-ते देवरूप आहे. मग देव नक्की आहे कुठे, याचंही उत्तर तुकाराम महाराज अभंगात देतात.
। जळी, स्थळी काष्ठी, पाषाणी। देव वसला चराचरी।
म्हणजेच या पृथ्वीतलावर जे काही सदृश्य आहे, त्या-त्या ठिकाणी देवाची प्राप्ती आहे. महाराज म्हणतात की, ज्याला देव बघायचा असेल त्याने ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्याला ज्ञान घ्यायचं आहे त्यानं गुरू केला पाहिजे, म्हणजे त्याला देवाची प्राप्ती होईल.
। गुरूचरणी ठेविता भाव। आपोआप भेटे देव।
गुरूचरणी भाव ठेवला तर आपोआप देव भेटेलच, अशी ग्वाही तुकाराम महाराज वरील अभंगात देतात. ते म्हणतात, गुरूशिवाय मार्ग नाही, त्यामुळे गुरूला शरण गेलं पाहिजे. पण काही ठिकाणी असं दिसतं की, गुरूला शरण जाऊनही काहींना देव काय आहे, हे कळत नाही. मग अशांनी काय करायचं, असा प्रश्न लोकांनी महाराजांना विचारल्यानंतर महाराजांनी याचं अगदी सोपं उत्तर दिलं आहे.
। देव वसे चित्ती। त्याची धरावी संगती।
महाराज म्हणतात की, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे; पण आपले षड्रिपू जोवर आपल्याला मुक्त करत नाहीत, तोपर्यंत आपण देवपणाला पोहोचू शकत नाही. कारण जोवर शरीरात दंभ, अहंकार, काम, क्रोध, मद-मत्सर आहेत; तोपर्यंत आपल्या हृदयातील परमेश्वर आपल्याजवळ असूनही आपल्याला भेटणार नाही. महाराज याठिकाणी म्हणतात की, ‘देव वसे चित्ती’, महाराज असेही म्हणू शकले असते की, ‘देव असे चित्ती’ पण महाराजांनी तसं न म्हणता असं का लिहून ठेवलं असावं? तर त्याचं कारण म्हणजे भगवंतांनी आपल्याला मनुष्यदेह दिला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे घटाघटात देव आहे, त्याचप्रकारे हृदयमंदिरातही देव आहे. फक्त तो आपल्याला कळत नाही, हेच आपलं सर्वात मोठं दुर्दैव.. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव वसे चित्ती त्याचप्रमाणे संत जनाबाई म्हणतात की ,
। धरीला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर।
। हृदयी बंदी खाणा केला। आत विठ्ठल कोंडीला।
वरील अभंगात जनाबाई देखील सांगतात की, देव शरीराबाहेर नाही तर शरीरातच हृदयस्थानी देवाला कोंडलं आहे. देवाने देह दिला; पण त्याचं सार्थक करता आलं नाही, याच अर्थाचा अभंग,
। जन्मा येवोनिया देख। करा जन्माचे सार्थक।
जनाबाई महाराज याठिकाणी म्हणतात, मनुष्यदेहाचे सार्थक करायचे असेल तर जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर पाहिलं पाहिजे. मग नुसतं पंढरपूर पाहून काय होणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही त्याचं उत्तर देणारा हा जगतगुरू तुकाराम महाराजांचा अभंग
। आलिया संसारा उठा वेग करा। शरण जा उदारा पांडुरंगा।
। देह हे काळाचे। धन कुबेराचे ।
। तेथे मनुष्याचे काय आहे।
महाराज म्हणतात, ज्यांनी ज्यांनी या संसारात जन्म घेतला आहे त्यांनी उठा, त्वरा करा आणि उदार मायबाप परमात्म्याला शरण जा. कारण तुम्ही येथे काही आणलं नाही, जे आहे त्याचं आहे. मग उगाच माझं माझं का करता, जे तुमचं नाही ते तुम्हाला मिळेलच कसं, त्यामुळे जनाबाई म्हणतात, जन्मा येवोनिया देख करा देहाचे सार्थक.. यावर तुकाराम महाराज म्हणतात, जो देह तुम्हाला भगवंताने दिला आहे. तो तुमचा नाहीच, मग उगाचच जगण्याचा आटापिटा का करता? जे धन तुमचं नाही, ते मिळवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस का झटता.
खरं तर देह काळाच्या अधीन आहे आणि धन कुबेराच्या अधीन आहे. मग तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर धनाची गरज नाही तर मनाची गरज आहे. कारण संसारात येऊन लोक जगतात; पण का जगायचं आणि कोणासाठी जगायचं हे फार कमी लोकांना कळतं. त्यामुळे संसारात आला आहात तर त्या भगवंताला शरण जा म्हणजे तो तुमचं सर्व दु:ख हिरावून घेईल.
शरीरातच देव कसा
आपण सुविचारात, प्रवचनात देव देवळात नाही, अंतरात आहे असं ऐकतो; पण अंतरातला देव प्रत्येकाला भेटेलच असं नाही. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की, लोकांनो देव पाहायला जाऊ नका. कारण मी देव पाहायला गेलो आणि देवरूप झालो म्हणजे ‘तूज आहे तूज पाशी, परी जागा चुकलासी!’ कारण स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, आचार-विचार या गोष्टी मनुष्याने जगण्याच्या सोयीनुसार बनवल्या आहेत त्यामुळे हे सगळं खोटं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात.
कारण स्वर्ग-नरक या भीती दाखवण्यासाठीच्या गोष्टी आहेत तर पाप-पुण्य केलेल्या कर्माचं परिमाण दाखवणा-या गोष्टी आहेत तर आचार आणि विचार या मनुष्याची ओळख पटवून देण्यासाठी असतात, कारण आचार आणि विचार या मनुष्यानुरूप बदलतात. सभ्य लोकांमध्ये चोरी करणे आणि शवविच्छेदन करणे पाप आहे; पण आज मुंबईसारख्या स्मार्ट सिटीमध्ये कित्येक लोकांची घरे मेलेल्या माणसांची विल्हेवाट करून चालतात, त्यामुळे आचार-विचार हे मनुष्याचं आयुष्य जगण्याचं प्रमाण आहे. महाराज याठिकाणी आचार-विचार आणि देहात देवाचे स्थान कसे आहे, हे या अभंगातून सांगतात,
। देव माझा मी देवाचा। हीच माझी सत्यवाचा।
। देह देवाचे मंदिर। आत बाहेरी निर्मळ।
। देव पाहावयासी गेलो। माझा मीच देव झालो।
। तुका म्हणे धन्य झालो। आज विठ्ठला भेटलो।
महाराज म्हणतात की, देव माझा आणि मी देवाचा आहे, कारण मला भगवंताची व्याप्ती समजली आहे. लोकहो, मी खरं सांगतो आहे. हा मनुष्यदेह म्हणजे देवाचं मंदिर आहे. जे आतून-बाहेरून निर्मळ आहे, त्यामुळे जेव्हा मी माझ्या अंतरंगात डोकावून पाहिलं, त्यावेळी मला माझ्यामध्येच देव दिसला. तुम्ही मला वेडा म्हणत असाल; पण मी वारी करून जो देव मला दिसला नाही, तो देव मला आता दिसला आहे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहावयासी गेलो आणि माझा मीच देव झालो. महाराज म्हणतात, ज्याला सर्वातूनी निघायचं आहे. त्याने आशा मारली पाहिजे, कारण आशा असली की, निराशाच पदरी पडते, त्यामुळे भगवंत प्राप्ती होत नाही, त्यामुळे मोह-माया आणि आशा ही बाजूला काढून ठेवाल तरच भगवंताची भेट होईल त्या अर्थाचा अभंग महाराज लिहितात,
। आशा ही समूळ खणूनी काढावी।
। तेव्हाची निघावे सर्वातूनि।
। नाहीतरी सुखे असावे संसारी। फजिती दुसरी करू नये।
। आशा मारोनिया यशवंत व्हावे।
आशा मारोनिया जयवंत व्हावे।
। तुका म्हणे जरी योगाची तातडी।
आशेची बी बुडी करी आधी।
वरील अभंगात महाराज म्हणतात, भगवंत प्राप्तीसाठी लोक तऱ्हेतऱ्हेचे सोंगंढोंगं करतात; पण त्यांना भगवंत सापडत नाही. मग त्यांनी काय करावे, याचं उत्तर देणारा हा अभंग. महाराज म्हणतात, देव सापडेल ही आशा सोडा आणि शोधायला सुरुवात करा, मग तुम्हाला देव सापडल्याशिवाय राहणार नाही. आशा सोडली तरच भगवंत प्राप्ती होणार आहे. त्यामुळे आशा ही समूळ खणुनी काढावी, असा पर्याय त्यांनी लोकांना दिला आहे.
आशा खणून काढली की, तुम्ही यशवंत, जयवंत व्हाल, जर तुम्हाला आशा सोडता आली नाही तर तुम्ही समाजातून निघून स्वत:ची फजिती करून घ्याल, त्यामुळे ज्यांना आशा, ममता सुटत नाही त्यांनी या भानगडीत पडू नये. त्यांनी आपला संसार करावा, नाहीतर यापेक्षा मोठी फजिती नाही.
महाराज म्हणतात, तुम्ही योग, तप, याग केले आणि आशा सोडली नाही तर भगवंत मिळणार नाही. जरी तुम्हाला योगी व्हायचं असेल तर तुम्ही आशेचं बी बुडवून टाका आणि मग या समाजातून मोह-माया, लालसेतून बाहेर पडा, असा महाराज अनुभव सांगतात. आचार-विचार, पाप-पुण्य मनुष्यानुरूप बदलत असतात; मग नेमकं पाप आणि पुण्य याचा देवप्राप्तीसाठी काय फायदा होणार आहे का? तर नाही पाप-पुण्य मनाचे खेळ काही लोक वाईट कृत्याला देखील पुण्य म्हणतात आणि चांगल्या गोष्टींना देखील पाप म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे काही लोक चोरी करून पोट भरतात, संसार चालवतात हे पाप की, पुण्य, तर याचं उत्तर असेल पुण्य कारण काही करून तो मनुष्य संसार चालवत आहे, व्यवहारिकपणे ते पाप असले तरी ते पुण्य म्हणावे लागेल.
कारण त्या पेशावर त्याचं घर चालतं, याउलट विचार करू या एखाद्या पोलिसाने एका कुख्यात गुंडाला ठार केले तर ते पाप की, पुण्य त्याचं उत्तर असेल हे पापच आहे. कारण एखाद्याचा जीव घेणे म्हणजे पापच; पण व्यवहारिक दृष्टिकोनातून हे पुण्यच आहे. कारण त्याने कित्येक लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले आहे, असो. मनुष्याच्या आचार-विचाराप्रमाणे हे बदलत असतं या अर्थाचा अभंग
। बोले तैसा चाले त्याचि वंदावी पाऊले।
म्हणजे जो व्यक्ती आचार विचाराबरोबर जसे बोलतो तसेच करतो तर त्याला वंदन केले पाहिजे, कारण पाप-पुण्य जरी मनुष्यानुरूप बदलत असले तरी तो जसा बोलला तसाच वागतो. याप्रमाणे महाराज एक आणखी अभंग लिहितात,
। बोलतो एक आणि करतो एक। त्याचं पाहू नये मुख।
महाराज या ओवीत सांगतात की, बोलताना एक आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये वेगळं उतरवणा-या लोकांचं तोंड पाहू नये अशाचा बहिष्कार केलेलाच बरा.
त्यामुळे कबीर महाराज एके ठिकाणी म्हणतात की, काय हे वेडे लोक आहेत जे पर्वत-डोंगर पालथे करून देव शोधत आहेत. काही जण तर सोंगंढोंगं करून देव त्यांना सापडला आहे, असा आव आणतात. पण तेही म्हणतात, देव देहाबाहेर नाही तर देहातच आहे, त्यामुळे उगाचच गया, काशी, मथुरा करण्यापेक्षा एकदा अंतरंगात डोकावून पाहिलं पाहिजे.
। मन राम है, तन मे शाम है। मेरे दिल मे मेरा भगवान है।
महाराज म्हणतात, माझ्या तना-मनात राम आहे आणि हृदयात पण देव आहे, त्यामुळे देव नाही, अशी जागा नाही तो भेटल्यापासून मला सगळं विश्व देवरूप दिसतं आहे. त्यामुळे कबीर महाराज म्हणतात, सोंगंढोंगं करण्यापेक्षा मनातच देवाला शोधा आणि देहात ज्याला देव सापडला त्याला चराचरात देव दिसल्याशिवाय राहणार नाही. उगाच माळ जपत बसून ‘राम राम’ करत बसलो तर ती माळ तरी काय करेल ज्याला देव कळाला नाही, ती माळ त्या मनुष्याला काय म्हणेल त्याचं कबीर महाराजांनी केलेलं मार्मिक वर्णन,
। राम राम जपत बैठे। लकडी मे डाला सूत।
। माला बेचारी क्या करेगी। जब जपने वाला भूत।