नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने मोबाईलच्या कॉल दरात ८० टक्के कपात केली आहे. मात्र, हे नवीन दर केवळ पहिल्या दोन महिन्यांसाठीच उपलब्ध असतील.
बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, बीएसएनएल आपल्या पायाभूत सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ करत आहे. त्यामुळे आम्ही कॉल रेटमध्ये ८० टक्के कपात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या सुविधांचा लाभ देता येऊ शकेल.
प्रति मिनिट आणि प्रति सेकंद बिलिंग योजनेत आम्ही कॉलचे दर कमी केले आहेत. नवीन ग्राहकाने बीएसएनएलचे कनेक्शन घेतल्यानंतर त्याला प्रति सेकंद प्लॅनसाठी ३६ रुपये तर प्रति मिनिट प्लॅनसाठी ३७ रुपयांचे व्हाऊचर रिचार्ज करावे लागेल.
ग्राहकाने ३७ रुपयांचे व्हाऊचर रिचार्ज केल्यानंतर त्याला बीएसएनएल नेटवर्कमध्ये प्रति मिनिट १० पैशात संभाषण करता येऊ शकेल. तर ३६ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर तीन सेकंदासाठी एक पैसा आकारला जाईल, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. बीएसएनएलकडे ७९.६ दशलक्ष ग्राहक असून देशातील पाच बडय़ा दूरसंपर्क कंपन्यांमध्ये त्यांची गणना होते.