अवयव प्रत्यारोपणासाठी पहिल्यांदाच दोन राज्ये एकत्र

अवयव प्रत्यारोपणासाठी पहिल्यांदाच दोन राज्ये एकत्र

मुंबईत पुन्हा एकदा हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गुजरात ते मुंबई असा प्रवास करून अवघ्या तासाभरात प्रवास पूर्ण केल्यानंतर हृदय मुंबईत आणून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

यंदाच्या वर्षातील मुंबईतील ही पाचवी यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे मागील काही महिन्यांपासून अवयवदानाबाबत सुरू असलेल्या जनजागृतीमुळे आता लोक स्वत:हून अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी आता दोन राज्यं एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

५८ वर्षीय एका व्यक्तीवर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीला हृदयविकारचा त्रास जाणवत होता. शरीरात रक्तस्राव होत असल्याने संबंधित व्यक्तीच्या हृदयाचे कार्य करणे मंदावले होते. त्यामुळे लगेचच हृदयप्रत्यारोपण करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, रक्तगट आणि हृदयदात्याच्या रक्तगटात तफावत येत असल्याने प्रत्यारोपण रखडले होते.

पण, सुरतमधील महावीर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचे रक्टगट संबंधित व्यक्तीशी जुळत होते. त्यामुळे सुरतमधील रुग्णाच्या नातेवाईकांशी अवयवदानाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा, एका व्यक्तीला जीवनदान मिळेल, या हेतूने दात्याच्या कुटुंबीयांनी हृदयदान करण्यास परवानगी दिली. महत्त्वाचं म्हणजे, सुरतहून मुंबईत हृदय आणून प्रत्यारोपण करणे ही अवघड प्रक्रिया होती. पण फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले.

यात त्यांना वाहतूक पोलीस व विमानतळ प्रशासनाची मोलाची साथ लाभली. सुरतहून मुंबईत अवघ्या १ तास ३२ मिनिटात हे हृदय आणण्यात आलं. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळ क्रमांक ८ वरून मिलिस्ट्री रोड, सांताक्रूझ, चेंबूर लिंक रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ऐरोली जंक्शनवरून फोर्टिस रुग्णालयात असा प्रवास करत हृदय आणून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तास ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया चालली, अशी माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी दिली.

रुग्णालयात ही सलग पाचव्यांदा हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या अवयवदानाबाबत जागरूकता होत असल्याने गरजूंना अवयव मिळण्यास मदत होत आहे. याची प्रचिती म्हणजे एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी आता दोन राज्यांनी पुढाकार घेतला आहे.

गुजरातमधून आणलेल्या हृदयामुळे मुंबईतील एका व्यक्तीचे प्राण वाचविणे शक्य झाले. हे केवळ अवयवदानाच्या जागरूकतेमुळेच शक्य झाले आहे, असे फोर्टिस रुग्णालयाच्या संचालिका डॉ. एस. नारायणी यांनी म्हटले आहे. फोर्टिस रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे, डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *