मुंबईतील मालवणी भागातील तीन तरुण बेपत्ता असून हे तिघे ‘इसीस’ या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे तिन्ही तरुण दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत.
अयाज सुल्तान (२३), मोहसिन शेख (२६) आणि वाजिद शेख (२५) अशी या तरुणाची नावे असून हे तीघे मुंबईतील मालवणी परिसरातील रहिवासी आहेत. दोन महिन्यांआधी कोरकोळ कारण सांगून हे तिघे घराबाहेर पडले होते. मात्र ते अजूनही घरी परतलेले नाही.
अयाजने आपण पुण्यात नोकरीसाठी जात असल्याचे सांगितले तर मोहसिनने मित्राच्या लग्नाला जाणार आहे, असे कारण सांगितले. वाजिदने आधार कार्डमधल्या त्रुटी दुरुस्त करुन येतो, अशी कारणे सांगून तिघे घराबाहेर पडल्याचे समजते.
हे तीन तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याचा एटीएसला संशय असून यापैकी अयाज सुल्तान याने याआधीच देश सोडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या तिघांच्या वागण्या-बोलण्यात बेपत्ता होण्याआधी अनेक बदल झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून समजते.