शंभर टक्के कर्जमाफीसाठी रत्नागिरीतील आंबा उत्पादक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेले सहा महिने आंबा उत्पादक कर्ज माफीसह अन्य मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार दाद मागत आहेत.
गेल्या वर्षीचा आंबा हंगाम तोटयात गेल्याने ज्ह्यिलतील आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे हातात आलेले पीक वाया गेले. त्यामुळे मागील वर्षीच्या हंगामासाठी १०० टक्के कर्जमाफी मिळावी, अशी उत्पादकांची मागणी आहे. यासाठी आंबा उत्पादक जुलै महिन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते, मात्र सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे पदाधिकारी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले होते.
यात संस्थेचे सचिव मंदार सरपोतदार यांच्यासह पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बावा साळवी, दत्ताराम तांबे, तुकाराम घवाळी, उमर धामणस्कर, कृष्णा शिवलकर, अविनाश गुरव, रफीकशेठ मुकादम, रियाज काझी, महेंद्र आंब्रे, सुरेंद्र भडेकर, राजेंद्र जाधव, बी. के. पालकर, संजय पाथरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्यात १०० टक्के कर्ज माफी मिळावी, कर्ज पुनर्गठन करण्यासाठी बँकांकडून सहकार्य मिळावे, नुकसान भरपाई अद्याप ७० टक्के लोकांना मिळालेली नाही ती आवश्यकता असल्यास हमी पत्राद्वारे त्वरित अदा करावी, पीक विम्याची मुदत वाढवून मिळावी व निकषाचा पुनर्विचार करावा, कृषी अवजारे ९० टक्के अनुदानावर त्वरित व मुबलक उपलब्ध करून मिळावी, सचिव स्तरावरील बैठकीचे त्वरित आयोजन करावे, कॅनिंगकरता लागणारा आंब्याचा प्रती किलो भाव कमीत कमी १०० रुपये भाव करून मिळावा, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यंदाचा हंगामही निराशाजनक असून हवामान आंब्यासाठी पोषक असल्याने आंबा व्यावसायिकांच्या हाती याही वर्षी काहीच येणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबा व काजू उत्पादक आत्तापासूनच खचून गेला असून; यात त्रित लक्ष घालावे, अशी मागणी आंबा उत्पादकांनी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.