मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात जानेवारी २०१६ मध्ये वायफायची सुविधा सुरू करणार असून जगातील हा सगळ्यात मोठा वायफाय प्रकल्प असल्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले. पिचाई हे बुधवारपासून तीन दिवस भारत दौ-यावर असून इंजिनिअर्स, उद्योजक आदींची ते भेट घेत आहेत.
बुधवारी दिल्ली विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात पिचाई यांनी ही माहिती दिली. भारत दौ-यावर आलेले पिचाई राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेणार आहेत.
पिचाई यांनी या कार्यक्रमात बोलतांना हैदराबादमध्ये खास भारतीय इंजिनिअर्सच्या भरतीसाठी नवीन कॅम्पस उभारणार असल्याची घोषणाही केली आहे.
‘महिन्याला लाखोंच्या संख्येने भारतीय ऑनलाइन युजर्सची संख्या वाढत असून त्यामुळे डिजिटल क्रांतीमध्ये भारताचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर २०१६ पर्यंत भारतातील १०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी २०१६ पासून मुंबईतील सीएसटी स्थानकापासून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार आहे.