दिल्लीमध्ये वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत २००० सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. याबरोबरच सर्व टॅक्सी सीएनजीवर करून घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
तसेच एक एप्रिलपासून डिझेल गाड्यांची नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच २०१५ पुर्वीच्या कोणत्याही खाजगी गाड्यांना शहरात प्रवेश दिला जाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत झालेल्या सुनावणीत हा आदेश देण्यात आला आहे. दिल्लीत दहा वर्षांपूर्वीचे डिझेल वाहन आणि १५ वर्षे जुने पेट्रोलचे वाहन चालविण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश मंगळवारपासून लागू करण्यात आले आहेत. जर नियमांचा भंग केल्यास दुप्पट दंड भरावा लागणार आहे. जर तिस-यांदा हे नियम तोडल्यास त्या चालकाचा वाहनचालक परवाना जप्त केला जाणार आहे.