सहिष्णुता हा देशाचा मूलभूत पाया आहे आणि कोणताही भारतीय अन्न, धर्म आणि प्रेम यांच्या संदर्भात इतरांना तुच्छ लेखत असेल तर तो नेता होण्यास लायक नाही, असा टोला प्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांनी भाजपा सरकारला लगावला आहे. लेखक आणि विचारवंतांच्या हत्यांचा निषेध करणा-या साहित्य अकादमीला त्यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे.
मी हे अगोदरही सांगितले आहे आणि आताही सांगतो की, कोण काय खातो, कोणत्या देवाची प्रार्थना करतो किंवा कुणावर प्रेम करतो, याच्या आधारे इतराना तुच्छ लेखणारे भारतासारख्या देशाचे नेते होण्यास लायक नाहीत,असे सेठ म्हणाले. बुधवारी सायंकाळी एका पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
आपला देश सहिष्णु आहे, यावर माझा विश्वास आहे. आपल्या देशाचा प्राथमिक ढाचा सहिष्णुता हाच आहे. कुणालाही हा ढाचा हायजॅक करू देता कामा नये, असे सेठ यांनी सांगितले. देशात असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांच्या विरोधात पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांना त्यांनी पाठिंबा दिला होता.