संसदेत कोणतेही कामकाज होत नसल्याने दुःख होत असून, यामुळे गरिब नागरिकांसाठी संबंधित अनेक विधेयके प्रलंबित आहेत आणि त्यांचे नुकसान होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी संसदेतील गदारोळावर आपले मत व्यक्त केले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून काँग्रेसकडून गेल्या तीन दिवसांपासून संसदेत गदारोळ घालण्यात येत आहे. सरकारच्या निर्देशानुसार कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने अनेक विधेयके मंजूरीपासून दूर आहेत.
मोदी म्हणाले, की जीएसटी विधेयक मंजूर होईल तेव्हा होईल. पण, संसदेत कामकाज होत नसल्याने गरिबांचा हक्क हिरावला जात आहे. गदारोळामुळे गरिबांना बोनस देण्यासंदर्भातील विधेयक अडकून पडले आहे. मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून 62 लाख कुटुंबीयांना 43 हजार कोटींची मदत पोचविण्यात आलेली आहे. या योजनेमुळे खाजगी क्षेत्र मजबूत झाले आहे. विकासासाठी खाजगी, वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रांना चालना देण्याची गरज आहे. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही दररोज एक कायदा कमी करण्याच्या विचारात आहोत. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे पालन केल्यानंतरच सर्वकाही व्यवस्थित होवू शकेल.