नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी हे समाजसेवेच्या नावाखाली समाजाची फसवणूक करत आहेत, असा गंभीर आरोप एका धर्मादाय संस्थेच्या विश्वस्तांनी न्यायालयात केला आहे. या आरोपाचा सत्यार्थी यानी इन्कार केला आहे.
सत्यार्थी यांनी मोठय़ा प्रमाणात निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आल्यावर सत्यार्थी यांनी हितसंबंधींनी आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हा खटला व आरोप केला आहे, असे सांगितले. सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतरच त्यांना खटल्यात गोवण्यात आले, असा दावा त्यांचे वकील प्रदीप दिवाण यांनी केला.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश कामिनी लाऊ याना मात्र हा युक्तिवाद पटला नाही. त्या म्हणाल्या की, कार्य जास्त महत्त्वाचे आहे. ज्यांनी नाव कमावलेले असते ते लोक एका रात्रीत बदनामही होतात. त्याचा या खटल्याशी संबंध नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सुनावणी १४ डिसेंबपर्यंत पुढे ढकलली.