पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मायदेशातील सामने यूएईमध्ये न खेळविता, आपल्याच देशात क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनवावे, असा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अधिकारी राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळण्यावरून चर्चा सुरू आहे. पाकिस्तानने भारतासोबत यूएईमध्ये मालिका खेळण्याची तयारी दर्शविली आहे. पण, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पाकिस्तानने भारतात येऊन खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर दुबईला गेले असून, ते पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी चर्चा करणार आहेत.
भारत-पाक मालिकेबाबत शुक्ला म्हणाले, की पाकिस्तानने मायदेशात क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनविले पाहिजे. पाकिस्तान सतत यूएईमध्ये खेळत असल्याने स्थानिक क्रिकेटला फटका बसत आहे. लाहोर सहजरित्या सुरक्षित ठिकाण बनू शकते. पीसीबीने लाहोरला सुरक्षित ठिकाण घोषित करून, स्टेडियमजवळ खेळाडूंसाठी सुविधा पुरविल्या तर भारताला लाहोरमध्ये खेळण्यास काहीच हरकत नसेल. पण, त्यासाठी पीसीबीने आगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सुरक्षेबाबतची हमी द्यायला हवी.