येथे शुक्रवारपासून रंगणाऱ्या त्रिकोणीय मालिकेद्वारे भारताचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची सुरुवात करेल. २० ते २९ नोव्हेंबर दरम्यान साल्टलेक येथे पार पडणाऱ्या या त्रिकोणीय मालिकेत बांगलादेश व अफगाणिस्तान संघांचा सहभाग आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान बांगलादेशमध्ये रंगणार असून, भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया विजेतेपदासाठी लढेल. त्याचवेळी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या त्रिकोणीय मालिकेद्वारे
द्रविडसाठी संघातील कमजोरी व बलस्थाने जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळेल. या मालिकेतील सलामीचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश, असा रंगेल.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अनेक प्रतिभावान खेळाडूंची संघात वर्णी लागली आहे. गतमहिन्यात झालेल्या १९ वर्षांखालील चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया ब्ल्यूकडून खेळताना ११७ चेंडंूत १४२ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिकी भुईकडे फलंदाजीची मुख्य जबाबदारी असेल. विशेष म्हणजे, चॅलेंजर स्पर्धेच्या कामगिरीनुसारच भारताच्या १९ वर्षांखालील संघाची घोषणा करण्यात आली.
रिकी व्यतिरीक्त दिल्लीचा उदयोन्मुख यष्टिरक्षक – फलंदाज ॠषभ पंत आणि झारखंडच्या विराट सिंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच, मध्य प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज अवेश खान, उत्तर प्रदेशचा शुभम मावी आणि फलंदाज अमनदीप खरे व अनमोलप्रीत सिंग यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. तरी संघात सर्वांची नजर असेल ती सध्या उत्तर प्रदेशकडून रणजी खेळत असलेला मूळचा मुंबईकर खेळडू सरफराज खान याच्यावर. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचे लक्ष वेधलेल्या या आक्रमक युवा खेळाडूकडे निर्णायक क्षणी सामना फिरवण्याची क्षमता आहे.