पाण्याचा मोठय़ा प्रमाणात होणारा अपव्यय टाळण्यासाठी भेटायला येणा-यांना अर्धा ग्लासच पाणी देण्याचा अभिनव पायंडा शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाडला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांत यंदा निम्माच पाणीसाठा झाल्याने ३० टक्के पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
त्याचबरोबर बांधकामे, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव यासाठीच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाण्याचा गरवापर करणा-यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
महापौर कार्यालयात विविध कामानिमित्त, बैठकांसाठी अनेक लोकांची ये-जा सुरू असते. या वेळी नागरिकांना अर्धा ग्लास भरूनच पाणी देण्याच्या सूचना धनकवडे यांनी दिल्या आहेत.
पाणी आणखी हवे असल्यास पुन्हा द्यावे, पण पाण्याची नासाडी होऊ नये, हा यामागचा हेतू आहे. महापौर कार्यालयात अर्धा-अर्धा ग्लासाने फारच छोटी पाणी बचत होणार असली तरी याचे अनुकरण संपूर्ण शहराने केल्यास खूपच मोठय़ा प्रमाणात पाणी बचतीच्या मोहिमेला साहाय्य होऊ शकेल.
शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या प्रत्येकाने दररोज पाण्याचा अर्धा ग्लास वाचवला तर येत्या पावसाळ्यापर्यंत पाण्याची मोठी बचत होऊ शकेल, असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे.