भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु असलेल्या बंगळुरुमध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मात्र मैदान ओले असल्यामुळे अद्यापही खेळाला सुरुवात होऊ शकलेली नाही.
कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. याआधीच्या दोन दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. पंचांकडून साडेअकरा वाजता मैदानाची पाहणी केल्यानंतर सामन्यासंबंधी पुढील निर्णय घेतला जाईल.
पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने गोलंदाजी करताना दुखापती होण्याचा धोका आहे. भारताची सरशी असलेली ही कसोटी निकाली निघण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. भारताने आपल्या फिरकीच्या बळावर पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव २१४ धावात गुंडाळल्यानंतर दिवसअखेर बिनबाद ८० धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही.